Wednesday 20 July 2022

माझ्या डायरीतून- ७३

‘ऑल इज वेल’चा सिग्नल मिळाला

१-८.१.२०१९

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!

काल शेजारची मैत्रिण रेखाकडे ३१ डिसेंबर साजरा केला.. फुगे लावून घर सजवलेलं.. खाणं..पिणं.. गप्पा.. गाणी.. फोटो काढणं.. ते लगेच शेअर करणं.. सगळं हौसेनं केलं तिनं... मजा घेतली आम्हीही.. आनंद वाटून घ्यायचा.. साजरा करायचा.. सगळ्यांना दाखवायचा.. स्वतःला, इतरांना बूस्ट करण्याचा हा एक उपाय...

....

पेट स्कॅन टेस्ट झाली.. एकूण तपासणी सत्रातला हा बहुधा शेवटचा टप्पा. रिपोर्ट डॉक्टरना दाखवून आलो. सर्व ओके आहे. बघता बघता सर्व तपासण्या झाल्या. ‘ऑल इज वेल’चा सिग्नल मिळाला आणि नव्या वर्षाची गाडी सुटली..!

.....

एक तारखेपासून गाण्याचा क्लास लावला आहे. श्वसनाचा व्यायाम म्हणून रोज एक गाणं म्हणायाला सुरुवात केली होती. म्हणतेच आहे तर जरा बरं म्हणता यावं म्हणून कॉलनीतल्याच मैत्रिणीचा क्लास लावलाय..

पाच तारखेपासून साहित्य प्रेमी भगिनी मंडळाच्या व्हॉट्सॅप ग्रुपवर ‘विचारार्थ’ हा उपक्रम सुरू करते आहे.

.....

९.३.२०१९

कॅन्सर सरव्हायव्हर म्हणून घेतलेली सोनाली बेंद्रेची मुलाखत ऐकली. असंख्यांच्या अनुभवाला सेलीब्रेटी लोक कसे सामोरे जातात या बद्दल सामान्यांना उत्सुकता असते. तिनं छानच निभावलं सगळं... या काळात झालेल्या आंतरिक संघर्षात स्वतःला सावरताना तिनं लॉजिकल थिंकिंगचा आधार घेतला. ‘हे मला का झालं?’ याचा पाठपुरावा करताना नशिबासारख्या गोष्टींचा आधार न घेता विवेकाचा आधार घेतला हे विशेष वाटलं. बर्‍याचदा कळतं पण वळत नाही असं होतं. अशा वेळी लोक अध्यात्मिक साधनेचा आधार घेतात... ती म्हणाली, मला आध्यात्म कळत नाही. पण मला आलेल्या अनुभवातून मी म्हणू शकते की माणुसकीवरचं प्रेम हेच अध्यात्माचं सार आहे...

या निमित्तानं पुन्हा स्वतः बद्दल विचार झाला.. मी याला कशी सामोरी गेले त्याचा आढावा घेतला गेला.. ‘बाय बाय’ करण्याचं निमित्त म्हणून एका कोपर्‍यात या आपत्तीचं स्वागतच झालं होतं. आजार थर्ड डीग्री थर्ड स्टेजचा आहे हे समजल्यावर ‘आता सहा महिने राहिले’ याचा डॉक्टरांनी सांगण्यापूर्वीच स्वीकार झाला. पण तसं काहीच झालं नाही. नाही..होय करत सर्व उपचार करून घेतले. त्या अग्निदिव्यातून उजळून निघताना वाटलं आपल्या हातून काही घडायचं असेल म्हणून हा अनुभव वट्याला आला... रोगजंतूंबरोबर केसबीस.. सगळं अवांछित नाहीसं झालं... रिनोव्हेशन केलेल्या घरासारखं झालं शरीर... पण गेलेले केस हळूहळू परत आले तसे बाकीचे सगळे अवांछितही हळूहळू हजर झाले. मी ‘नॉर्मल’ झाले आणि मागील पानावरून पुढे दिनचर्या सुरू झाली. भव्य..दिव्य, वेगळं काही घडलं नाही. छोटी छोटी कामं हातून होत राहिली अगदीच काही नाही असं नाही.. पण एवढ्यासाठीच का झाला ‘पुनर्जन्म’? असं वाटून मन खट्टू झालं... हळूहळू या अपेक्षाभंगाची धग निवली. असं बरं होऊन बाहेर पडलेल्या असंख्यांपैकीच मी एक..! फार अपेक्षा कराव्या असं काही घडलंच नाही हे मान्य करून, सामान्यपण स्वीकारून जमेल ते करत छोट्या परिघात आनंद देत-घेत राहाण्यात आता समाधान मानते आहे.,,!

.....

२४.४, २.५.२०१९

‘लेखकाची गोष्ट’ हे विश्राम गुप्ते यांचं पुस्तक वाचतेय. त्यातील ‘वाचन-लेखनातून मी कसा घडत गेलो’ याचा आलेख म्हणजे भ्रमनिरासांचा प्रवास वाटतोय.. साहित्य वर्तुळातल्या सगळ्या ग्रेट वाटणार्‍या गोष्टींमधला पोकळपणा उघडा केला आहे. इतकं आतलं, इतकं खरं लिहिण्यासाठी वाचन मनन यांचा आवाका दांडगा असायला हवा... पाश्चात्य साहित्याच्या तुलनेत मराठी लेखक, वाचक, समीक्षक कसे किरकोळ आहेत ते येताजाता सारखं दाखवून दिलेलं आहे. हे सर्व वाचताना जाम कॉम्लेक्स आला.. या पुस्तकानं अस्वस्थ.. अंतर्मुख केलं..

या पार्श्वभूमीवर एका कवीसंमेलनाला गेले होते. अनिच्छेनच. कार्यक्रम खूपच उशीरा सुरू झाला. तोपर्यंत सहनशक्ती संपलेली. काहीच छान वाटत नव्हतं. ‘लेखकाच्या गोष्टी’नं वारंवार मराठी साहित्याचं क्षुद्रपण परोपरीनं दाखवून दिलेलं... अख्ख मराठी विश्वच इतकं लहान परीघ असलेलं.. तर त्यात हे असे समारंभ साजरे करणे म्हणजे जगण्याला दयनीय उत आणणंच आहे.. असं वाटत राहिलं...

‘लेखकाची गोष्ट’ मधे सगळ्याचा इतका किस काढलाय की वाटलं सर्व धडपडीचा  ‘भमनिरास’ हाच सारांश निघतो... आजाराच्या अनुभवानं सगळ्यातलं वैयर्थ दाखवून दिलंय.. आता कशाचा जाच करून घ्यायचा नाही. आला क्षण आपला. तेव्हा जे वाटेल, जमेल ते करायचं..!

.....

५.७.२०१९

रुटीन चालू आहे. व्यायामामधे गाणं सामिल झालं आहे. आज एक हिंदी गाणं म्हटलं. ‘चलो एक बार फिरसे अजनबी बन जाएँ हम दोनो..’ गाणं म्हणताना एकदम मनात आलं की यातलं हम दोनो म्हणजे शरीर आणि चैतन्यतत्त्व..! हे आधी वेगळे, अपरिचित, अजनबीच असतात. जन्म-पक्रियेत ते एकत्र येतात. शरीर थकलं की त्याला म्हणावसं वाटू लागतं- ‘चलो एक बार फिरसे अजनबी बन जाएँ हम दोनो..’

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment