Wednesday 17 August 2022

मार्च १९९८-२००० मधील नोंदी- ८

२३

आपला खारीचा वाटा

२.७.२०००

स्वेच्छानिवृत्तीचा विचार चालू आहे. निवृत्तीनंतरचं नियोजन म्हणून पीएच डीचा विचार करत होते. पण तो विचार मनातून काढून टाकल्यावर तत्त्वज्ञान विषय घेऊन एम ए करावं हा विचार पकड घ्यायला लागलाय. काल सिलॅबस वाचलं. रेने देकार्त अभ्यासाला आहे. कुठेतरी त्याच्या विषयीचा लेख वाचून त्याचं तत्त्वज्ञान समजून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली.... 

देकार्त म्हणतो, ‘वेळ थोडा राहिलाय. अनादि-अनंताचे गुंते सोडवत बसायला मला वेळ नाही. ईश्वर आहे. त्याने मला मुक्तच जन्माला घातलेय. स्वतःला तुच्छ, हीन न लेखता मला माझे काम सर्वक्षमतेनिशी करणे शक्य नाही काय?..’

....

पुणे विद्यापिठात एम ए (तत्त्वजान)चा अर्ज भरून झाला. इंटरव्ह्यू झाला. तत्त्वज्ञान विषय का घ्यावासा वाटला?... मी सांगितलं, ‘घरातल्या वातावरणामुळे हा विषय जिज्ञासेचा झालेला आहेच... पीएच डी साठी ‘बुद्ध, तुकाराम, गांधी यांचा मानव ते महामानव प्रवास कसा झाला याचा एकत्रित अभ्यास करावा अशी कल्पना सुचली होती. पण हा विषय साहित्याच्या विभागात बसत नाही, त्यासाठी तत्त्वज्ञान विषय घेऊन एम ए करावं लागेल असं समजलं. म्हणून अर्ज करतेय...’

.....

 

१७.९.२०००

अर्ज मंजूर होऊन प्रवेश मिळाला. एक महिन्याची रजा घेऊन विद्यापीठात जायला सुरुवात झाली...

एकदा बसनी उतरून घरी चालत येताना एक माणूस दिसला. आजारामुळे त्याचा एक पाय आणि एक हात वाकडा झाला होता. पायरी उतरताना त्याला दुसर्‍याचा आधार घ्यावा लागला. उतरून तो लंगडत चालायला लागला. त्याला पाहून उगीच आठवून गेलं की ‘आजारा’शिवाय आयुष्याजवळ पुष्कळ काही असतं. तो गृहीत धरून त्याला त्याच्या जागी ठेवून दिला की इतर गोष्टीत समरसायला होतं. तो चालताना काहीतरी पुटपुटत होता. वाटलं की तो नामस्मरण करतोय. जरा पुढे गेल्यावर स्पष्टच ऐकलं. तो ‘ओम नमः शिवाय’चा जप करत होता. एक गहीवर आला. नंतर बरंच काही घडलं... तरी स्मृतीपटलावर तो ‘ओम नमः शिवाय’ म्हणणारा माणूस तरळत राहिलाय. त्यानं कुठली साधना केली असेल?

.....

३, ७.१०.२०००

आज बँकेत जायचंय. महिनाभर रजा भोगून घेतली. कॉलेजचा अनुभव झाला. तत्त्वज्ञानाचा आवाका लक्षात आला आणि शिकवण्याचाही. सध्यातरी नोकरीला पर्याय नाही असा फील आलाय.

प्रत्येक कळणं (आकलन) हे एका अर्थी प्रतिकात्मकच असतं. माती घेऊन त्याला वेगवेगळे आकार द्यावेत तसे प्रत्येक आकलन म्हणजे भाषेत व्यक्त झालेला आकार. एक चिन्ह. शब्द-ज्ञान म्हणजे या चिन्हाचं ठरलेल्या नियमांनुसार डीकोडिंग करणं. आत्मज्ञान म्हणजे ते स्वतःला आपणहोऊन कळणं... पण आपलं कळणं हे स्वतंत्रपणे आपलं असतं का मुळात? जन्माअधीच्या आणि नंतरच्या संस्कारातूनच ते उगवत असणार...

आकाशाचं आकलन न होणं सहन करत कसं काय जगू शकतो आपण?

कितीही उंच उडी मारली. अगदी बांबूचा आधार घेऊन उंच उडीचे रेकॉर्ड केले तरी आकाशाच्या संदर्भात त्या उडीला काय अर्थ?... तरी जिवाच्या आकांताने उंच उडीचा सराव का चालू ठेवायचा?

.....

१७.१०, ७.११.२०००

सध्या नोकरी एके नोकरी चाललंय... काम अंगवळणी पडलंय. हळूहळू त्यात रमायला झालंय. व्हि आर एस स्कीम येण्याची चिन्ह दिसत नाहीएत... एम.ए. बारगळलंय...

.....

२०.११.२०००

मी स्वस्थता, प्रसन्नता, शांतता मिळवू पाहतेय... कवितेला तर अस्वस्थतेचं अग्निकुंड सतत पेटतं ठेवावं लागतं.... कवितेचा रोल (माझ्या आयुष्यातला) आता संपला आहे काय? मला होत असलेल्या आकलनासाठी दुसरे एखादे माध्यम शोधायला हवेय? की जगणं हेच अभिव्यक्तीचं माध्यम करू? जे माझं प्राथमिक ध्येय आहे...

.....

३१.१२.२०००

सगळ्या बाजूचे दरवाजे बंद झाल्यासारखी... बँकेची एकच वाट राहिल्यासारखी स्थिती झाली. अस्थिरतेतून बाहेर येत सहर्ष बँकेत रमले... आणि आता ज्याची वाट पाहात होते ती स्वेच्छा निवृत्ती योजना आली आहे... आनंद आहे..! समाधान आहे. नवं जबाबदारीचं काम जमेल की नाही असं वाटत होतं. पण निष्ठेनं, जिद्दीनं केलं आणि जमलं..! रजा न घेता कामात असतानाच निवृत्त व्हायचं असं ठरवलेलं तेही जमतंय...!

उद्या एकविसाव्या शतकाचा पहिला सूर्योदय. या नव्या शतकाचा शेवटचा सूर्योदय आपण पाहाणार नाही. या दोन सूर्योदयांमधल्या घडामोडींमधे आपला खारीचा वाटा असेल तो आपल्या परीनं अर्थपूर्ण करणं, सुंदर करणं आपल्या हातात आहे..!

***

मार्च १९९८-२००० मधील नोंदी- ७

२२

छोट्याशा प्रमोशनचा ‘अपूर्व’ अनुभव

३, ५.१.२०००

नवीन वर्षाची सुरुवात छान मूडने झाली. काहीतरी निर्णय झाल्यासारखी स्वस्थता होती. सकाळी फिरायला गेले तेव्हा चंद्र आणि चांदणी छान दिसली. तिकडे लक्ष गेलं हे विशेष.. परत येताना वाटेतल्या शेळ्या मी आले तरी बाजूला झाल्या नाहीत. त्याचंही बरं वाटलं. मूड कोसळवतो तसा सगळं छानही वाटवतो...

मजल दर मजल करत वर्ष निघाले आहे आपल्या गतीने. एका बाजूला हा वेग अनावर वाढतो आहे आणि एका बाजूने कसली तरी घाई झाल्यासारखी वाट पाहातेय मोकळं होण्याची. अस्थिरतेतून बाहेर पडण्याची... इथे आहे तोवर इथे असून घ्यायला हवंय...

.....

 

६, ७.२.२०००

ठरल्याप्रमाणे काल झोनल ऑफिसमधून रिलीव्ह झाले. सगळं काम संपवल्याचं समाधान, मैत्रिणींना सोडून निघण्याचं दुःख, सेंड ऑफमुळे आलेली रुखरुख, नवीन जागी जाण्यातली धाकधुक... असं काय काय रेंगाळतंय मनात आणि कॅलिडोस्कोप मधल्या काचांसारख्या त्याच्या हिंदकळण्यातून वेगवेगळ्या आकृत्या तयार होतायत...

दत्तवाडी ब्रँचला हजर होऊन प्रत्यक्ष काम करताना टेन्शन आलं.. वाटलं जमेल की नाही.. नकोच.. पण संध्याकाळी सगळं काम झाल्यावर सगळ्यांनी खूप मनापासून धीर दिला. इतका की त्या चांगुलपणानं गहिवरून आलं. असं मनात आलं की ज्या निष्ठेनं आणि जिद्दीनं मी तुकाराम-गाथा वाचली तशी भूमिका आताही घ्यावी. सगळ्यांनी धीर दिलाय तर मी आपल्या सूप्त क्षमता वापरायला हव्यात.. प्रमोशन घेतलंय तर हे काम निभावणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे असं वाटतं आहे. हा प्रामाणिकपणाच मला ते निभवायचं बळ देईल. आणि त्याचं बक्षिस म्हणून सर्वांचं सहकार्य मिळेल असा आतून विश्वास वाटतो आहे...

बघता बघता नवीन कामात रुळले. हळूहळू ते सोप्पं वाटायला लागलंय.. नेहमीचं पासिंग ऑफिसरचं काम.. वेळ पडली तर कॅश ऑफिसर म्हणून कॅशच्या किल्ल्या सांभाळणे, दिवसाच्या शेवटी कॅश बॅलन्स करणे, कॅशची ने-आण करणे... अशी कामं मी कधी करीन असं चित्रच रंगवलं नव्हतं... मी घेत असलेला नोकरीतला हा अनुभव माझ्यासाठी ‘अपूर्व’ आहे...

....

१४, १५.३.२०००

म.सु. पाटील यांचं पत्र आलंय. ‘मी एक दर्शनबिंदू’ हा नवा कवितासंग्रह अपेक्षाभंग करणारा आहे म्हणून. ८-९ मुद्द्यातून उणीवा दाखवल्या आहेत. पत्र वाचून धक्का बसला. पण उपेक्षा करण्यापेक्षा सविस्तर पत्र लिहिलं याचंच बरं वाटलं. पत्र पुन्हा पुन्हा वाचून त्यांना सविस्तर उत्तर लिहिलं तेव्हा बरं वाटलं...

उपनिषदांचा अनुवाद वाचतेय. एकच गोष्ट आपण पुन्हा पुन्हा वाचतोय असं वाटत राहिलं. उपनिषदातील तत्त्वज्ञानात नंतर कुणी भर घातली का असा प्रश्न पडला..

.....

२.४.२०००

आज व. दि. कुलकर्णी सरांची भेट झाली. त्यांनी मी पीएच डी करू नये असा सल्ला दिला. समीक्षेबद्दल विचार करू नये, आपणच आपली समीक्षा करावी असंही सांगितलं...

गेले काही दिवस वेणू पळशीकर यांनी अनुवाद केलेलं ‘एका काडातून क्रांती’ हे पुस्तक वाचतेय. आज पूर्ण झालं. या पुस्तकानं बरंच अंतर्मुख केलं, अस्वस्थ केलं आणि दिलासाही दिला.. बर्‍याच नोंदी केल्यायत डायरीत.

निसर्ग हे विश्वातील घडामोडींचे अविचल उगमस्थान आहे. आताचं निसर्गापासूनचं तुटलेपण सांधणं अवघड आहे. या वन वे रस्त्यावरून आता मागं फिरणंही अशक्य आहे. आता फेरा पूर्ण करायलाच हवा..!

....

१६.५.२०००

काल विद्या सप्रे चौधरी यांचा फोन होता. नवीन संग्रहातल्या कविता वाचून त्यांना वाटलं की माझ्या व्यक्तिमत्वात फार मोठं परिवर्तन घडतं आहे. कदाचित ते मलाही माहिती नाही. मला काहीतरी हवंय त्याच्या परीघापर्यंत मी आलीय... इत्यादी. ऐकून बरं वाटलं...! त्यांना सविस्तर पत्र लिहिलं...

आज संस्थेत फिरताना गुलमोहराच्या झाडाखाली उभी राहून आस्वादत होते झाडाचा बहर... ऐसपैस बहर... परवा वाचलं.. Share in the joy of someone else’s glory’.. तसं शेअरिंग अनुभवत होते... तिथं नेहमी फिरायला येणार्‍या कुणाला वाटलं मला फुलं हवीयत... कुणाला वाटलं माझा हात पोचत नाहीए.. कुणी म्हणालं आम्हाला कविता ऐकायला मिळणार या झाडावर... मी त्या झाडाचा बहर आस्वादला.. अनुभवाच्या ओंजळीत ते जमा झालं..!

***

मार्च १९९८-२००० मधील नोंदी- ६

२१

‘विश्वात आपण एकटेच आहोत का?’

१३, १७.६.१९९९

ठरल्याप्रमाणे सकाळी भूगावला शरद कापुसकर यांच्या डोंगरावरच्या घरी गेलो. नेहमीप्रमाणे मजा आली. स्वातीशी विशेष गप्पा झाल्या. एम ए नंतर आता पीएच डीचा विचार मनात येतोय.. ‘बुद्ध, तुकाराम, गांधी’ असा अभ्यास विषय सुचलाय.. इत्यादी बोलणं झालं.. तिला विषय आवडला... नंतर आप्पांचा, (माझे वडील) विषय निघाला. त्यांच्याविषयी सांगितलेलं ऐकताना तिला रडूच आलं.. मीही हलले. या विषयावर काहीतरी लेखन करायचे मनात आहे... मागे एकदा सचिनशी (माझा भाचा) बोलताना आप्पांचा विषय निघाला. तो त्यांच्याविषयी आदरानं बोलला. म्हणाला, ते कोण आहेत, काय आहेत हे त्यांना माहिती नसेल.. ते त्यांच्या काळात जगण्यासाठी नव्हते....

.....

 

बुद्धावरची तीन पुस्तकं आणलीयत... धर्मानंद कोसंबी यांचंही पुस्तक मिळवलंय. वाचते आहे... वेगळं काही समजतं आहे.. बुद्धाने चैनीचा गृहस्थाश्रम आणि संन्याशांची तपश्चर्या दोन्हीचा निषेध केला. त्यानी सर्व समकालिन वाद नाकारले. परलोक चर्चा त्यानी अनावश्यक मानली. दुःख दूर करणे महत्त्वाचे मानले... त्याने गृहत्याग केला तो केवळ आत्मज्ञान, आत्मबोध करून घेण्यासाठी नाही. परस्पर सलोख्यानं चालणारी समाजरचना कशी करता येईल असा विचार तो सतत करत असे. तपश्चर्येने यावर काही मार्ग सापडेल म्हणून त्याने गृहत्याग करून तपश्चर्या केली. पण त्यातून काही निष्पन्न होत नाही हे पाहून तपश्चर्या सोडून दिली आणि एक अभिनव मध्यम मार्ग शोधून काढला. त्याच्या या क्रांतिकारी विचारांमुळे त्याला नास्तिक, अक्रियावादी मानले गेले...

बुद्धाने यज्ञ, जातिभेद यांचा निषेध केला. ‘यज्ञ’ बेकारी नाहीशी करण्यासाठी करावा असे सुचवले. बेकारी घालवण्यासाठी यज्ञ म्हणजे रोजगार हमी योजना.....

.....

 

१८.६.१९९९

आज मूड जाण्याची परिसीमा झाली. सकाळी आणि संध्याकाळी अनावरपणे चिडले. मनातल्या मनात खुशाल वाईट विचार येऊ दिले. कुणाचं तरी देणं दिल्यासारखे. पारा नॉर्मलवर आला लगेच. धुमसत राहिले नाही. स्वतःला टोचत राहिले नाही. तरी प्रसन्नता कोसो मैल दूर आहे. आणि मी नखशिखांत दुश्चित अवस्थेत बुडते आहे. रूटीन पार पाडते आहे.... एकदा पूर्ण भिजल्यावर एखादी सर अंगावर आली तर तिच्यापासून बचावण्यासाठी धावत नाही आपण तसं झालंय. तब्येत, मूड कशाकडेच लक्ष द्यायचं नाही. नुसतं पाहात राहायचं. ‘Tolarance is obediance to God.. सहन करणं म्हणजे ईश्वराची आज्ञा पाळणं’ असं कुठं तरी वाचलं होतं. मनातल्या बिथरलेपणापुढे अशा शहाणपणाचे तुकडे टाकते आहे. शिदोरी काठोकाठ भरलेली आहे. त्यातल्या कोणत्या चेंडूचा नेम बसेल कळत नाहीए...

.....

 

११, १३.७.१९९९

आज जयंत नारळीकरांचा सकाळ पेपरमधला लेख वाचला. त्यातल्या ‘विश्वात आपण एकटेच आहोत का?’ या प्रश्नातील आपण म्हणजे ‘पृथ्वी’ हे स्केल लक्षात घेऊन विश्वातील गहन अथांगात आपण एकटेच आहोत या भयंकर कल्पनेनं पृथ्वीवरील सर्व मानवजात, जीवसृष्टी एखाद्या घरातील भावंडांसारखी एकमेकांना बिलगून बसली आहे असं चित्र डोळ्यासमोरून तरळून गेलं...

....

१९९५ सालच्या ‘लाहो’ या कवितासंग्रहानंतरच्या कविता एकत्र करतेय. नव्या संग्रहाची तयारी...!

 

१५, १९, २५.९.१९९९

बँकेत नवीन योजनेनुसार आपोआप प्रमोशन मिळते आहे. ते स्वीकारावे म्हणून जवळची, सोयीची शाखा देणार आहेत. बरीच उलटसुलट चर्चा चालू आहे. होय नाही करत मी ते स्वीकारायचं ठरवते आहे.. याकडे मी स्वतःतील मर्यादांच्या पार होण्याच्या दिशेने केलेला प्रयत्न म्हणून पाहते आहे. जे मला जमत नाही, जमावं असं वाटत नाही त्यातला ‘आळस’ झटकून फुल स्विंगमधे नोकरी करायचं ठरलं... स्वेच्छानिवृत्तीचे वेध लागलेलेच आहेत. प्रमोशन घेऊन बाहेर पडेन तेव्हा आत्मविश्वास वाढलेला असेल...

चोवीस तारखेला ‘स्पेशल असिस्टंट’ च्या पोस्टसाठी लेखी स्वीकृती दिली आणि निर्णय-प्रक्रियेवर पडदा पडला..! यथावकाश त्यासाठीचं आठ दिवसांचं ट्रेनिंग झालं...

......

 

२५.११, ११.१२.१९९९

 

कवितासंग्रहाचं स्क्रिप्ट डीटीपीला गेलं. ‘मी एक दर्शनबिंदू’ असं शीर्षक अचानक सुचलं आणि पक्क झालं... मुखपृष्ठाची निवड झालीय. आता मनोगत लिहायचंय..

.....

पुस्तकाचं मी करायचं काम संपलं... पुस्तक चांगलं होईल आणि त्याचं भवितव्यही असं लिहिता लिहिता मनात आलंय...

.....

२३.१२.१९९९

आज एम ए (मराठी)चं सर्टिफिकेट मिळालं. प्रथम वर्ग असं लिहिलेलं पाहून छान वाटलं... कवितासंग्रहही तयार होऊन हातात आला... वर्षाखेर छान साजरी झाली..!

***

मार्च १९९८-२००० मधील नोंदी- ५

२०

मग मीही सुंदर दिसेन झाडासारखी..!

 

१३,१४.१.१९९९

चंद्रकोर कपाळावर कोरावी असं प्रथम कुणाला सुचलं असेल? चेहर्‍याला चंद्राची उपमा देणार्‍या कवीपेक्षा ही कल्पना व्यापक आहे..! कपाळ म्हणजे आकाशच झालं की..!

ज्ञानेश्वरांनी ‘ब्रह्म सत्य जगन्मिथ्या’ मधलं ‘ब्रह्म सत्य’ मानलं. पण विश्व मिथ्या हे मानलं नाही. विश्व हे मिथ्या, खोटं नाही तर ते ‘ब्रह्म’चा विलास आहे असं म्हटलं. शंकराचार्यांच्या तत्त्वाचं असं आकलन करून घेणं हे ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वरपण..! जगन्मिथ्या याचा शब्दशः अर्थ न घेता त्यातलं काव्यात्म सत्य (पोएटिक ट्रुथ) लक्षात घ्यायला हवं ते घेतलं जात नव्हतं ‘जगन्मिथ्या’चा निराशावादी, स्थितीप्रिय बनवणारा परिणाम होऊ लागला होता. ज्ञानेश्वरांनी ‘नाही असं नाही’ ही भाषा बदलली. शून्यामागे एक अंक काढला. आणि निरर्थकाला अर्थपूर्ण केलं. ‘मिथ्या’ला चिद्‍विलास म्हटलं..! अभ्यासाच्या निमित्तने चाललेल्या आजच्या वाचनातून हे समजलं आणि ग्रेट वाटलं. ज्ञानेश्वरी वाचनाचा मूड आला.

 

बुद्ध, शंकराचार्य, चक्रधर यांच्या व्यापक अलिप्त दृष्टीला जगातील व्यवहार क्षणिक, आभासमय वाटणारच. त्यांनी आपले हे जाणवणे, आकलन सर्वसामान्यांसमोर मांडले ते प्रपंचात अतिरिक्त लडबडण्याच्या संदर्भात. अतिरिक्तपणाची सीमा ओळखता आली पाहिजे. आपण मोठे झाल्यावर पेन्सिल हरवली म्हणून रडणार नाही. त्या हरवण्याचं दुःख आपल्याला रडण्याइतकं मोठं वाटणार नाही. बुद्ध, शंकराचार्य, चक्रधर हे बुद्धी, ज्ञान, अनुभूतीच्या पातळीवर इतके ‘मोठे’ झाले की जगातले कुठलेच दुःख त्यांना रडण्याइतके मोठे वाटले नाही. इतकंच नाही तर ते दुःख, दुःखच वाटलं नाही. ते दुःख निर्माण करणार्‍या घटना तात्कालिक, क्षणिक, आभासमय, खोट्या वाटल्या. एखाद्या कवीने आपले ‘वाटणे’ शब्दबद्ध करावे तसे त्यांनी हे उत्कट, प्रगल्भ ‘वाटणे’ तत्त्वविचार म्हणून सांगितले असेल...

......

 

२८.२.१९९९

कवितेचा एक दुसरा प्रवाह जो मला आतापर्यंत अपरिचित होता, आता ओळखीचा झाला आहे, त्या प्रवाहामागच्या कविताबाह्य भूमिकेसह.. आणि मी अस्वस्थ होते आहे. माझी अस्वस्थता नक्की कशासाठी आहे? ती मला कुठे नेणार आहे? माझ्या कवितेतील वैचारिकता हे कदाचित तिचं सामर्थ्यही असेल. पण तसं ठामपणे म्हणणारं कोणी भेटत नाहीए.... जसजसं वाचन वाढतं आहे तसतसं आपण काहीच नाही.. कुठेच नाही हे असमाधान वाढतं आहे. त्यामुळे अस्वस्थता? मी स्वतःशी प्रामाणिक राहून लिहीत राहावं... स्वतःला वाढवत राहावं..

सकाळी फार ग्रेट वाटतं ते संध्याकाळी बुटकं वाटतं... हे माझ्या वाढीचं चिन्ह आहे आणि अस्वस्थतेचंही....

.....

 

१९.४.१९९९

कॉलनीच्या सुरुवातीला एक झाड आहे. वाळक्या, मळक्या पानांनी भरलेलं होतं. त्याच्या शेजारचं झाड पिवळ्या फुलांनी नखशिखांत भरलेलं... हे झाड सहनसिद्धी प्राप्त झाल्यासारखं उभं होतं स्वस्थ. हळूहळू पानगळ झाली. हे पुरतं रिकामं झालं. मग शेंड्यापासून पिवळ्या फुलांची झुंबरं लटकू लागली. हिरवी कोवळी पानं लकाकू लागली. मधून मधून वाळक्या शेंगा आणि गळता गळता लटकून राहिलेली काही पानं तशीच त्या झळाळत्या झुंबरांच्या मधून... त्याला हे झटकावसं वाटलं नाही. जे जसं आलं.... गेलं त्याचा सहज स्वीकार करत राहिलं ते.... मी रोज त्याच्याकडे बघते जाता-येता. ते खूप सुंदर दिसते आहे. जसे आहे तसे. वाळक्या शेंगा आणि मळक्या पानांसकट... पिवळी झुंबरं आणि कोवळ्या पोपटी पानांसकट...! या झाडासारखं नुसतं असण्याचा सराव करायला हवा. सहनसिद्धी असो नसो.. नुसतं सहज असणं.. आहे त्या सगळ्यासकट.. मग मीही सुंदर दिसेन झाडासारखी..!

......

 

३१.५.१९९९

एम.ए. मराठी पार्ट २ परीक्षा संपली. छान लिहीता आलं नाही याची रुखरुख वाटत राहिली बराच वेळ....

परीक्षा झाल्याबरोबर सातारा- औंध ठरल्याप्रमाणे झालं... परतीच्या प्रवासात गाडीत माझ्या शेजारी एक शेतकरीण होती. तिच्याशी चक्क गप्पा मारल्या. तिची मळलेली मुलं फरसाण खात होती. ती ज्योतिबाला जाऊन आली होती. त्यांनी होळीत वाजवतात तसला डमरू (टिमकी) आणला होता. त्या मुलानं तो काढला आणि वाजवायला लागला. त्रासायला झालं नाही. उलट मजा वाटली. तो बसमधे खुशाल खाली बसला.. त्याच्या आईनं बसू दिलं.. खालच्या कचर्‍याचं त्यांना काही वाटलं नाही. त्यांच्या या करण्याचाही एक जैविक अर्थ भावून गेला. ‘सुसंस्कृत’ होता होता आपण जगण्यापासूनच दुरावत जातो... ही माणसं जगण्याच्या जवळ राहतात असं वाटून गेलं..

गाडीत एक मुलगा अचानक किंचाळला. सगळी ताडकन त्याच्याकडे बघायला लागली. काय झालं? कुणाला काही कळेना... मग तो ओरडला ‘इंडिया जीत गया..’ जिंकल्यामुळे आपण महत्त्वाच्या फेरीत प्रवेश केला. सगळ्यांनी त्याच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला दाद दिली. इंडियानं जिंकणं या विषयीचा हा सार्वत्रिक आनंद बराच बोलका आहे..

***

मार्च १९९८-२००० मधील नोंदी- ४

१९

सगळंच at somebody else’s cost

२.५.१९९८

समोरच्या कुंडीतल्या मोगर्‍याच्या पानावर वरून थेंब थेंब पाणी पडतंय... प्रत्येक टपोर्‍या थेंबाच्या धक्क्यानं ते छोटसं झाड हलतंय. पानावर पडलेला पाण्याचा थेंब पानानं सांभाळून ठेवलाय... त्याच्या टोकाशी येऊन तो थांबलाय. त्या दोघांचा सहवास काही क्षणांपुरता. वरून आणखी एखाद-दुसरा थेंब येईल, फार तर तिसरा चौथा.. मग त्यांच्या धक्क्यानं हा पहिला थेंब गळून पडेल. आणि त्याजागी हळूहळू दुसरा थंब येईल. या थेंबांची ये-जा सांभाळणारं, अनुभवणारं पान स्वतःही हळुच केव्हातरी गळून पडेल. आणि त्याच्या जागी दुसरं उगवेल. पानांची ही ये-जा सोसणारं झाडही... हे चक्र फिरत राहातं. निरोप आणि स्वागत दोन्ही दोन अवस्थांच्या प्रतिक्रिया आहेत फक्त. त्या नाइलाजानं द्याव्या लागतात तशा सहर्ष स्वीकारताही येतात..

....

 

१३.८.१९९८

काल ‘विद्रोही कविता’ या कवितासंग्रहाची प्रस्तावना वाचली. केवळ सुख-चैनच नाही तर सर्व श्रेष्ठ कला, मूल्ये, उच्चतम असं सगळंच at somebody else’s cost असा फील आला. जसं मुळं आणि फळं.... फिरणार्‍या राहाटाची भरलेली गाडगी वर येतात.. रिकामी होऊन परत खाली जातात... झाडं स्थिर दिसली तरी तिथंही असंच चक्र चालू आहे. मुळं जीवनरस पुरवतात झाडांना आणि पानं फळं फुलं अखेर सुकून खाली पडतात.. जमिनीत गाडली जातात.. खत बनून मुळांना जीवनरस पुरवतात. एका वेगळ्या अर्थानी, वेगळ्या तर्‍हेनी वेगळ्या पातळीवर ‘आहेरे’ वर्ग देणं चुकतं करतच असतो. शोषण करण्याची क्रिया शोषले जाण्याच्या क्रियेची दृश्य बाजू असते. जन्माला आल्यापासून जसा आपला मृत्यूकडेच प्रवास चाललेला असतो...

तरी क्रांती व्हावी. उलथापालथ व्हावी. फळांना फळ या अवस्थेतच कळावं मुळांचं गाडलेलं असणं.. आणि मुळांनाही कळावी फळ-फुलांच्या शोषणाची जीवघेणी रीत...

.....

 

२७.९.१९९८

आवाजाच्या अनावर लाटांपासून बचावेल असे एकही बेट उरलेले नाही. मेंदूतील श्रवण केंद्रावर एकामागून एक आघात होताहेत. बांधकामावरच्या सिमेंट-वाळूच्या पाट्या एकीकडून दुसरीकडे जलद पोचवणार्‍या मजुरांच्या रांगेप्रमाणे मेंदूतील पेशी ध्वनी-संवेदन एकमेकींच्या हाती देत पुढे पोचवताना त्यांना निमिषभराचीही उसंत मिळत नाहीए... पुराचे पाणी घरात शिरल्यावर जीवाच्या भीतीने वरच्या वरच्या मजल्यावर जात राहावे तसे या आवाजाच्या पुरापासून बचाव करण्यासाठी कुठे जाता येईल?...

भोवतीच्या समाजात आपापल्या वृत्ती-कोषात जगत असतात सगळे... आवाजाच्या भोवर्‍यात भेलकांडून झिंग एन्जॉय करणारे आणि त्रासून त्रासून अगतिकतेच्या दरीत कोसळणारे... खुशाल झापडं लावून जगणारे आणि भोवतीच्या अनाचाराबद्दल आक्रोश करणारे... बदलासाठी झगडणारे किंवा कुरतडत राहणारे स्वतःला... त्याच त्याच रेकॉर्ड्स आलटून पालटून लावणारे आणि नव्यासाठी आसुसलेले... स्वतःच्या नावाची पाटी घेऊन भिरभिरत राहणारे आणि तहानेमागे तृप्तपणे धावणारे... प्रतिक्षिप्तपणे वागण्याचे कार्य असलेल्या इंद्रियांप्रमाणे अंतःप्रेरणेच्या आदेशाची वाट न पाहताच प्रतिक्षिप्तपणे जगत असतात माणसं..!

.....

 

९.१२.१९९८

‘ते’ पूर्ण आहे... हे पूर्ण आहे...’ ही विनोबांनी मराठीत केलेली प्रार्थना मूळ संस्कृतमधून समजून घ्यावी असं वाटलं... प्रथम ज्याला ही पूर्णत्वाची जाणीव झाली असेल तो किती उंचीवर पोचला असेल..! त्याची खूण म्हणून त्यानं ती अनुभूती शब्दबद्ध करून ठेवली. तिथे निशाण रोवून सर्वांना आवाहन देत राहिला. एक सर्वकालिक शहाणपण नोंदवून ठेवलं. त्यानं जाणिवेचा एक मार्ग प्रशस्त केला. आपण त्यावरून चालत गेलो तर त्या उगमाच्या शिखरावर पोचू शकतो...

 

१८.१२.१९९८

आज रेडिओवर ‘चिंतन’मधे जे कृष्णमूर्तींचे विचार सांगितले. त्यातल्या एका वाक्याने लक्ष वेधले- ज्ञान म्हणजे खरंतर अनावरण. पण आपण पुस्तकं वाचून, शिकून त्यावर आवरणं घालत राहातो...!

***

मार्च १९९८-२००० मधील नोंदी- ३

१८

माझं निरीक्षण हा एका माणसाचा स्व-शोध आहे.

 

१६.४.१९९८

काल चिडाचिड झाली मनातल्या मनात सगळं फेकून दिलं. फाडाफाडी केली. उव्देगाच्या टोकाशी जाऊन आले. उबग.. कंटाळा सर्वव्यापी झाला. अशा मूडमधे अभ्यास झालाच नसता म्हणून बँकेत गेले. या मूडने बर्‍यापैकी असर टिकवला. पण काम हातावेगळं केलं याचं समाधान वाटलं. संध्याकाळी खूप दमायला झालं तरी थोडा अभ्यास झाला.

माझं बिथरणं हे दाखवण्यासाठी असावं की अजून घसरवणारे बरेच अवशेष बाकी आहेत...

आज सकाळी संस्थेत फिरायला गेले होते. माझ्या नेहमीच्या दगडावर बसले. डोळे मिटून सूर्याकडे बघण्याचा अनुभव घ्यायची सवय झालेली. प्रथम पिवळा सोनेरी, मग केशरी रंग गडद गडद होत पुन्हा सोनेरी पिवळा होतो.. आणि डोळ्यांवर हात ठेवला की शांत करणारी अखंड निळाई... हा रंगाचा खेळ पुन्हा पुन्हा अनुभवण्यासारखा असतो. पण आज सूर्य अजून वर आला नव्हता. त्यामुळे रंगांचा खेळ अनुभवता आला नाही. तरी डोळे मिटून बसले. सकाळी रेडीओवर ऐकलेल्या गाण्याची एक ओळ तरंगत होती मनात... दरशन दे रे दे रे भगवंता.. मिटलेल्या डोळ्यांसमोरच्या अंधार-उजेडात त्याच पोताची एक बारीक कड्यासारखी आकृती दिसली. मनात कल्पना केली की तो मुकुट आहे कृष्णाचा. खूप दुरून कुणीतरी आपल्याकडे यावं तशी ती आकृती जवळ येत होती. वाटण्याकडे दुर्लक्ष करून तिचं जवळ येणं पाहात राहिले. तर ती पणतीची कड आणि ज्योत असल्यासारखी वाटली. अगदी जवळ आली असं वाटत होतं तेव्हाही ती अजून कितीतरी वेळ येतच होती. विचलित न होता पाहात राहिले. मग सारं सारखं झालं. अंधार-उजेडाची छटा सर्वभर ताणून बसवल्यासारखी एकसंध निराकार झाली...

जे काही अनुभवलं त्याचा आनंद वाटला प्रसन्न करणारा.... असा आनंद शेअर करता येत नाही..!

या सगळ्याचा व्यवहारी जगण्याशी काय संबंध? काही नाही.. पण तो कशाला असायला हवा? क्षण एक पुरे... स्टाईल असा निखळ आनंदाचा एक क्षण.. बस इतकंच.

......

 

२८.४.१९९८

एम. ए. (मराठी) साठी एकेक विषय अभ्यासताना अधिकाधिक अंतर्मुख होते आहे आणि बाह्य घटनांबद्दलही जागरुकता वाढते आहे. माझ्या अंतर्मुखतेला नेहमीच वस्तुनिष्ठतेचं परिमाण मिळत असतं. माझं निरीक्षण हा एका माणसाचा स्व-शोध आहे.

अभ्यासाच्या निमित्ताने दोन्ही महायुद्धे.. जगभरातल्या क्रांत्या या बद्दलची अधिक माहिती समजून घेण्यातून आकलनात भर पडली. इतिहास आणि भूगोल याची समज हे आकलन वाढण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नाथपंथापासून सर्व संप्रदायातील संत महात्मे तीर्थयात्रेच्या निमित्ताने पदयात्रा करीत. त्यामुळे त्यांना होणारे समाज, सृष्टी यांचे आकलन त्यांच्या अंतर्मुखतेला पूर्णतेचे परिमाण देत असेल.

मागे एकदा असं वाचल्याचं आठवलं की अंतःकरणाची अत्यंत निर्मल, अत्यंत पवित्र अवस्था म्हणजे मुक्ती. आणि हेही आठवलं की माझ्या आंतरिक प्रवासाचे ध्येय ते आहे. आज असं वाटलं की आप्पांची (माझे वडील) हीच इच्छा माझ्यात उतरली आहे. मध्यंतरी एकदा जाणवलं होतं तेही आठवलं..-

‘तीव्र इच्छाच आपल्याकडून सर्व करून घेते, आपण स्वतःला ‘इच्छेच्या’ स्वाधीन करायचं. किंवा इच्छेला आपल्या रक्तात मिसळून द्यायचं. मग ती आपल्या निरपेक्ष आपल्या माध्यमातून काम करते. जसे रक्त, श्वास.. आपल्यासाठी काम करतो. आपली जगण्याची इच्छा जन्मक्षणीच आपल्या पेशींमधे संक्रमित होते आणि पेशींबरोबर वाढत वाढत अनेक होते. अंतर्बाह्य आपल्याला लपेटून बसते. इतकी की कधी कधी क्षणिक उव्देगाच्या भरात ‘आता पुरे’ असं वाटलं तरी ‘पुरे’ होत नाही. थांबत नाही जगणे. श्वासांची जेवढी पुंजी बरोबर आणली असेल ती संपेपर्यंत ती इच्छा आपल्यात सळसळतच राहते.’

आपण ‘निवडलेली’ अशी इच्छा जिव्हारी लागलेली असली की तीच आपल्यातील कार्यकारी अभियंत्याची जागा घेते. आणि आतल्या बाहेरच्या सर्व उपलब्धतांना साधन बनवते आणि पूर्णत्वास जाते.

आत्ता लिहिता लिहिता असं वाटलं की आपली कोणती इच्छा अशी जिव्हारी लागेल, तीव्र बनेल, आणि केव्हा बनेल यावर बाह्य, वैश्विक इच्छेचे नियंत्रण असते काय? साधी एखाद्यासाठी मनात उगवणारी शुभेच्छाही प्रत्येक वेळी तितकी हार्दिक असत नाही, तेव्हा वाटलं तरी...

.....

घरातला पसारा ही नेहमीच चीड आणणारी गोष्ट. आताशा त्याचा त्रास होत नाही. यात बेफिकीरी नाही. त्याहून महत्त्वाच्या गोष्टीत लक्ष असल्यामुळे त्याचं महत्त्व कमी वाटणंही नाही. त्या पसार्‍यात, त्याच्या अस्ताव्यस्ततेत एक व्यवस्था, सौंदर्य आहे असं जाणवलं. छान वाटलं. आप्पा ‘कुठे काय विस्कटलंय’ असं म्हणायचे त्यामागे मनाची ही अवस्था असेल?

***

मार्च १९९८-२००० मधील नोंदी -२

१७

‘हृदयी स्वयंभचि असे’

१.४.१९९८

‘जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात’.... सातशे वर्षांपूर्वी सर्वांसाठी केलेली ही प्रार्थना आत्ता माझ्या डोळांसमोर आहे. ती मला दिलासा देते आहे. प्रार्थनेच्या उद्‍गारपूर्व अवकाशातील सदिच्छांची कंपनं या पट्टीवर छापलेल्या अक्षरांत बद्ध आहेत. त्या अक्षरांपलिकडे जाऊन त्या कंपनांना स्पर्श करण्याचा प्रयत्न मी करते आहे.....

आज सकाळी झोपेत ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ हे आठवलं. यातील ‘चिंतीत’मधे बरंच काही मननीय आहे, ‘पुढे वैखरी राम आधी वदावा’ यातही समजलेय त्याहून अधिक काही आहे... उच्चार नंतर... त्या आधीच राम मनात उमटावा.. असं काही...

सकाळी अभंगांची कॅसेट ऐकली.. ‘तुका म्हणे सोपी केली पायवाट..’ ही ओळ पूर्वसूरींची कृतज्ञता म्हणून त्यांनी लिहिली. ती त्यांच्यासाठी म्हणाविशी वाटली..

 

२.४.१९९८

भाषाशास्त्राचा अभ्यास चाललाय. ओम या उच्चाराची व्याप्ती ‘अ ऊ’ (कण्ठ्य उच्चार) ते ‘म’ (ओष्ठ्य उच्चार) जाणवून स्तिमित व्हायला झालं...

भाषा कशी निर्माण झाली ते वाचताना मजा आली. घशातून आवाज निघतो याची समज माणसाला आली आणि या आवाजांचा उपयोग संदेशनासाठी होतो हेही लक्षात आलं. तेव्हा गंमत वाटून मुलांनी खेळण्याशी खेळ करावा तसा माणसाने घशातून निघणार्‍या ध्वनीशी केला असेल. खेळता खेळता त्याला वेगवेगळे ध्वनी सापडले असतील. आणि अधिक चांगले संदेशन साधले गेले असेल. त्याची पुनरावृत्ती झाली असेल. मग अनुकरण झाले असेल. रूढी बनली असेल. संकेत मान्यता पावले असतील.... हे वाचताना मनात आलं, ‘मा निषाद...’ हे वाल्मिकी ऋषींचे काव्योद्गार नोंदले गेले म्हणून आपल्याला माहिती झाले. पहिली ध्वनीसंहिता केव्हा निर्माण झाली असेल? कोणत्या अनुभूतीला प्रथम उच्चार मिळाला? असे उच्चार मिळून अभिव्यक्ती व्दारा ते इतरांपर्यंत पोचवले जाऊ लागले त्यापूर्वी या आतच पडून राहणार्‍या अनुभवांचे काय होत असेल? त्यांचे स्वरूप कसे असेल?

.....

 

३.४.१९९८

ज्ञानेश्वरीतल्या १०८ ओव्यांचं छोटं पुस्तक पुन्हा वाचतेय. अधिक आतला अर्थ कळतोय. या अर्थाच्या जवळ जातेय असाही अनुभव येतो आहे. कृतज्ञतेचा एक निश्वास आपोआप बाहेर पडला आत्ता.... त्यातली एक ओवी अशी-

मोटके गुरुमुखे उदैजत दिसे । हृदयी स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावो लागे तैसे । आपैसयाचि ॥ 

इथे ‘गुरू’ संदर्भात ‘जग संपूर्ण गुरु दिसे’ (संत एकनाथ) हे आठवलं. आणि  ‘हृदयी स्वयंभचि असे’ या संदर्भात प्रॉफेटमधलं शेवटचं अल्‍मुस्तफाचं म्हणणं...

I only speak to you in words of that which you yourselves know in thoughts... And what is word knowledge but a shadow of wordless knowledge..!

***