Wednesday 20 April 2016

कशाची पूर्वतयारी आहे ही ?

२५ जुलै १९९७

      दिवस उजाडलाय. पाण झाकोळलेलंच आहे वातावरण. आकाशात ढगही नाहीत जमलेले. अख्ख आकाशच एक ढग झालंय की काय ? पावसानं ओथंबलेलंही वाटत नाहीय. नुसताच सुंद मुड आहे हवेचा. तळ्यासारख्या माझ्या मनाच्या पाण्यात प्रतिबिंबित झालंय हे सगळं ! बळेच स्वत:ला उठवून कामाला लावलंय. 

       हवेचं बरं आहे ना... वाटलं तरच वाहते प्रसन्नपणे. नाहीतर ठप्प राहाते निःशंकपणे. त्या त्या वेळच्या वाटण्याशी एकनिष्ठ. तिला भीती नाही वाटत की, पुन्हा प्रसन्नतेचा ऋतू येईल की नाही याची ! आतून फाकेल प्रकाश, उजाडेल या विश्वासाचीही गरज नसल्यासारखी हवा ‘असते’ नुसती. कधी ठप्प तर कधी सळसळत. दोन्ही ‘अवस्थाच’ केवळ..! हे स्वयंभू शहाणपण कसं विसरतं पुन्हा पुन्हा? की मरगळ आपला रोल इतक्या इंटेन्सली, खरेपणानं, बजावतेय की ती कायमसाठी आलीय मनात वास्तव्य करायला असं वाटावं!

       आजतर ती इतकी अस्ताव्यस्त पसरलीय मनभर की सकाळी फिरयला गेल्यावर आपापल्या दिनचर्येत मग्न झालेल्या तमाम लोकांचं कौतुक कौतुक वाटलं ओतप्रोत ! मुलांना शाळेत घेऊन जाणारा रिक्षेवाला, पेपर टाकणारी मुलं, मुलांची दप्तरं हातात घेऊन मुलांना शाळेत सोडायला जाणार्‍या आया, देवासाठी फुलं.. दुर्वा गोळा करणार्‍या गृहिणी, मस्तीत वाहनं चालवणारी माणसं.... वाटलं की उभारी धरून ही सर्व माणसं काहीतरी करताहेत हे किती बरं आहे ना ? 

       मरगळून, ढेपाळून सगळी ठप्प राहिली तर? भलेही ती आतून कशीही असतील, वरच्या या कृतींनाही महत्त्व आहेच आहे. कुणासाठी काही करायला हवं अशी बांधीलकी नसलेली माझ्यासारखी माणसं, काठावरून बघत राहतात नुसती. विचार करतात (किंवा करत नाहीत), अर्थ लावत राहतात सगळ्याचा, निष्कर्ष काढतात... जगणारी वेगळीच राहतात. आज असं वाटलं एकदम की काळजी करावा असा देहाचा संसार तरी आहे, हे बरं आहे ना ? एका अर्थी जमीनीवर यायला. नाहीतर .... काय माहीत ?

रुटीनमधें अडकलेल्या, सुखेनैव (?) गुंतलेल्यांच्या कौतुकाची मजल कुठंपर्यंत गेली माहीती आहे ? भ्रष्टाचार... इत्यादी, ‘कु’व्यवहारात गुंतलेल्या लोकांचंही एका अर्थी कौतुकच वाटलं. वाटलं की किती त्रास घेऊन ते निभावतायत आपला ‘कु’रोल ! या सर्वव्यापी मरगळीनं, निराशेनं, निष्क्रियतेनं त्याना थोडाही स्पर्श केलेला नाही. किती समरसून, at any cost, उमेदीनं ते निभावतायत त्यांनी निवडलेली लाईफस्टाईल !... की तेही नाईलाजानेच चाललेत पुढे... परतीची सोय नसलेल्या या वन वे रस्त्यावरून ?

***

२७ जुलै १९९७

वावटळीचा जागीच घुमवणारा वेग कमी झालाय. उडालेली धूळ हळुहळु खाली बसतेय. वाट चुकून भरकटलेले धुळीचे कण परतलेत आपल्या घरी. जमीन सुखावलीय मुलं सुखरूप परतल्यावर नकळत निःश्वास टाकणार्‍या आईसारखी. आतले प्रवाह कसलीशी चाहूल लागल्यासारखे आंतरिक ओढीनं निघालेत कुठेतरी .... कशाची पूर्वतयारी आहे ही ?

*** 

No comments:

Post a Comment