Saturday 2 April 2016

हिणकस गोष्टीच आकार पेलत असतात..

२७ जून १९९७

      या असीमाच्या पसार्‍यात आपल्या नगण्यतेला काही सीमाच नाही ही जाणीव सतत क्षीण होत जाऊन मी म्हणजेच सगळं काही हे वाटणं इतकं ताजं, इतकं खरं होऊन आपल्याला लपेटून बसतं की बस..! पण हे किती बरं आहे ना? अभिमानानं, उमेदीनं जगायला बळ त्यातूनच तर मिळतं!... कोणी केव्हा केलं असेल ‘केव्हा काय वाटायला हवं’ असं जाणीवेचं प्रोग्रॅमिंग?

***

२८ जून १९९७

      कालचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम छान झाला. पण अशा कार्यक्रमांचं भाबडं कौतुक आता वाटत नाही. उलट अशा उत्सवांमुळे कमअस्सल साहित्य / कला लोकांसमोर येतात. त्यांचाच गवगवा होतो. ती म्हणजेच कला / काव्य असा समज होतो... असे विचार मनात येऊन ‘काय चाललंय हे?’ अशी प्रतिक्रिया मनात उमटली. आणि लगेच असंही वाटलं की आपल्याबद्दलही इतर काहींना असं वाटत असेल.. हे जाणवून अस्वस्थ व्हायला झालं.

      आजुबाजूच्या सगळ्या अशा गुंत्यात, भंगारात मनाला न पटणार्‍या, बरं न वाटणार्‍या गोष्टी निर्ममपणानं नाकारायच्या ठरवल्या तर सगळ्यातून निवृत्तच व्हावं लागेल. जगण्यासाठी उमेद बाळगायची तर काही कमअस्सल गोष्टी स्वीकाराव्या लागतात. नाकारण्यात वाइटाबरोबर बरंही नाकारलं जातं. त्याहून अधिक बरं होण्याची शक्यताही नाकारली जाते. काकांशी बोलताना समजलेली ‘मिथून’ कल्पना इथे आठवतेय. शुद्ध गोष्ट शुद्ध स्वरूपात ‘आकार’ घेऊच शकत नाही. कल्पनेतून ती आकारात ‘उतरते’ तेव्हा हिणकस गोष्टीच तो आकार पेलत असतात. जसा मृण्मय देह चैतन्य, आत्मतत्त्व धारण करत असतो.!


*** 

No comments:

Post a Comment