Monday 18 April 2016

काही सेकंदांचं ते दृश्य..

११ जुलै १९९७

आपल्या दुःखातून उजळून निघायचं, संकटातून नवा मार्ग काढायचा, नवं वळण नवी दिशा मिळवायची आयुष्याला.. हे संत तुकारामांनीही सांगितलंय. नुसतं सांगितलं नाही, तसं जगून दाखवलंय. ते म्हणतात, ‘बरं झालं शूद्र म्हणून जन्माला आलो नाहीतर अहंकारानंच बुडालो असतो. बरं झालं बायका मुलं मेली.. दुष्काळात सगळं उद्‍ध्वस्त झालं.. आता मोह करावा असं काहीच नाही उरलं. लौकिक आयुष्यातल्या या संकटांकडे त्यांनी असं पाहिलं. हे केवळ पराभव स्वीकारणं नव्हतं तर संकटातून तावून सुलाखून अधिक उन्नत करणार्‍या मार्गाचा शोध घेण्याची संधी आहे असं मानणं होतं... अशा आत्मशोधाचा पूर्ण आलेख असलेले अभंग इंद्रायणीत बुडवले तेव्हा तर या दृष्टिकोनाची कसोटीच होती. तुकाराम महाराज या कसोटीलाही उतरले. लोक म्हणतात की अभंग तरले... केवळ अभंग नाही ते स्वतःपण तरले....!
     
      परवा सातारला जाताना प्रवास अनुभवत होते. बाहेरचं धावतं दृश्य, ओव्हरटेक करणारी वाहनं, मागे पडणारी वाहनं.. झाडं.. रस्ते.. एका ट्रकला अमच्या एस. टी.नं ओव्हरटेक केलं. तेव्हा त्या ट्रककडे लक्ष गेलं.. २५-३० वर्षांचा तरूण ड्रायव्हर ट्रक्क चालवताना स्टीअरिंगवर हातानं ताल देत गात होता बहुधा. तो ड्रायव्हिंग एन्जॉय करतोय असं त्याच्या चेहर्‍यावरच्या हावभावावरून वाटलं. तो गाण्याच्या तालावर अंगही मजेत हलवत होता. आमची गाडी ओव्हरटेक करून पुढे जाताना गाडीकडे बघत जाओ जाओ असं इतक्या सहज गंमतीनं म्हणत होता की वाटलं आमचं पुढं जाणंही तो एन्जॉय करतोय. काही सेकंदांचं ते दृश्य, हा अनुभव त्या ड्रायव्हरच्या सर्व प्रतिक्रियांसह उगीचच लक्षात राहून गेला..!

***

No comments:

Post a Comment