Thursday 14 April 2022

माझ्या डायरीतून- ३०


६.७.२००

टिपून घेतलेले काही...

‘असे कधीही म्हणू नका की मी एक वस्तू गमावलीय. म्हणा की वस्तू परत केली गेली...’

‘शब्दात प्रकट झाल्याने आपले विचार कसे ‘दिसतात’ ते कळते. अशा प्रकटीकरणामुळे शेवटी आपण स्वतःपेक्षा अधिक शहाणे होतो. एका तासाच्या अशा अभिव्यक्तीने आपण जितके शहाणे होतो तितके दिवसभराच्या चिंतनानेही होणार नाही’

‘तू स्वतःला जाण’ एवढे म्हणून भागणार नाही. स्वतःचे ज्ञान म्हणजे अर्धे ज्ञान. दुसर्‍याचे, भवतालाचे ज्ञान होणे आवश्यक आहे.’

‘माणूस स्वतःच्या क्षमतांनुसार वस्तूंचे आकलन करून घेतो. म्हणून आपले आकलन हे वस्तूंचे आकलन नसते तर ते आपले स्वतःचेच आकलन असते.’

......

२४.७.२००६

‘तत्त्वज्ञानाच्या प्रत्येक पंथातील प्रत्येक आचार्य हा थोडासा लबाड असतो. जगात ढोंगी लोकानाच सदैव खात्री असते. ते निःशंक असतात. त्यांना प्रश्न पडत नाहीत. संशय वाटणे ही काही चांगली स्थिती नाही पण खात्री वाटणे हे तर हस्यास्पद आहे.’

‘विचार करण्यामुळे दुःखी झालेल्या आणि न करण्यामुळे सुखी झालेल्या दोघांची गोष्ट.. दुःखी माणूस म्हणतो, मी विचार केला नाही तर मीही सुखी होईन पण ते सुख असे आहे जे मी इच्छित नाही.’

‘तत्त्वज्ञानाचा शेवट जरी अनुत्तरीत प्रश्नांनीच व्हायचा असेल तरी तत्त्वज्ञान हे माणसाचे परमोच्च साहस आहे. सद्‍वस्तूशास्त्राची (Metaphysics) चार हजार पुस्तकेही आत्मा काय ते तुम्हाला शिकवू शकणार नाही.’

......

२५.७.२००६

त्रेपन्न फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या पाच वर्षांच्या ‘प्रिन्स’ला लष्कराच्या जवानांनी दोन दिवसांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी बाहेर काढले. सर्व न्यूज चॅनल्सचा आणि वृत्तपत्रांच्या मथळ्यांचा विषय (एक दिवसापुरता) प्रिन्स हा होता.... एका सामान्य लहान मुलाला इतक्या अशा प्रयत्नांनी बाहेर काढण्यासाठी केवढी यंत्रणा कार्यान्वित झाली..! त्या विहिरी शेजारी एक विहिर खणून खालून बोगदा करून त्या मुलापर्यंत जवान पोचले आणि त्यांनी त्याला वर काढलं. या सगळ्यासाठी मेहनत, खर्च, कौशल्य, आणि धाडस या सगळ्याची फार मोठ्या प्रमाणावर गरज होती. ती उपलब्ध झाली. या सगळ्यामागे कोणती प्रेरणा प्रभावी ठरली असेल? सरकारी आदेश, आणि तो आंमलात आणण्याच्या यंत्रणेतले सर्व दुवे झपाटल्यासारखे कुठल्या आवेगांनी कार्यान्वित झाले असतील? पाच वर्षाच्या मुलाची स्वतःची अशी काय जिजीविषा असणार? एवढ्या प्रचंड प्रयत्नांनी जीवदान मिळालेल्या आयुष्याचं पुढं काय होईल? हे सर्व मिरॅकल कशामुळे, कशासाठी घडलं? मूल दोन दिवस अन्नपाण्यावाचून जगलं, त्याला वाचवण्याचे प्रयत्न झाले, ते यशस्वी झाले.... या सर्व नाट्यातला प्रत्येक क्षण मिरॅकल घडवण्यासाठी राबत होता. कोणी घडवलं हे सारं की केवळ एक हॅपनिंग?

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment