Thursday 10 March 2022

माझ्या डायरीतून- २०

२६.१.२००५

आपण मणसाचे कितवे वंशज? या अनाकलनीय लांबीच्या वंशावळीचे आपण फलित... एवढ्या सगळ्यांच्या सतत बदलत गेलेल्या अंशांचे ओझे वागवत जगत असतो. ‘That Solitory Individual’- शुद्ध स्व-रूपाकडे परतण्यासाठी बाहेरच्या गर्दीपासून दूर जाता येईल कदाचित पण या आतल्या गर्दीचं काय करणार?

......

२९.१.२००५

ज्ञानेश्वरी वाचन बरेचदा केवळ एक रूटीन होतंय. अधुन मधून थांबवावं असं वाटतं. तरी चालू ठेवलंय. सायनेकर सरांशी या संदर्भात एकदा बोलले तर ते म्हणाले, ‘उत्कटतेनं आशयाला भिडता येण्याचे क्षण मोजकेच येतात. तंबोरा सारखा लागलेल्या अवस्थेत ठेवता येत नाही. तारा उतरवून ठेवाव्या लागतात..’ अशा संवादातून दिशा आणि दिलासा मिळत राहातो. विचारात स्पष्टता येते... मीही एका कवितेत लिहिलं होतं- ‘चैतन्यदायी क्षण कुछ ज्यादाही क्षणिक होता है..!’

.......

१४.२.२००५

एम. ए. प्रथम क्रमांकासाठी असलेले एस पी कॉलेजचे विठ्ठल रामचंद्र सासवडकर – स्वामी शिवानंद सरस्वती पुरस्कृत पारितोषिक १०६/- रुपये मिळाले...! घेताना मज्जा वाटली.

.......

८.५.२००५

ज्या स्वशोधाच्या वाटेने मी जाते आहे तो प्रत्येक शोध म्हणजे आकलनाची एकेक पातळी. ही प्रत्येक पातळी काही एक उंची गाठत जाते. पण प्रत्येक उंचीवर हेच अधिकाधिक खरेपणानं कळतं की खरं कळणं अजून दूर आहे. खरं कळणं म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती... म्हणजे कळण्याचं विसर्जन. हे मला जाणवत असल्यामुळे मी ठाम उच्चरवात कोणताही दावा करत नाही. आणि हे कुणाला कळावं, कुणी मला त्याची पावती द्यावी यामुळे फारसं काही साधणार आहे असंही नाही. पण अधुन मधून तशा पावतीची तहान लागते...!

***

असावरी काकडे

No comments:

Post a Comment