Monday 1 August 2016

ज्ञानाचा पुनर्जन्म..!

२०.१.१९९८

ज्ञानेश्वर, तुकाराम या संतांनी काळाची आणि भाषेची आवरणं बाजूला सारून ‘ज्ञान’ समजून घेतलं आणि समजून सांगितलं. नवीन काही भर घातली? ज्ञान म्हणजे काय? आवरणं बाजूला सारणंच तर आहे. मूळ ज्ञान ज्याला प्राप्त झालं त्यानं तेच केलं फक्त. म्हटलं तर नवीन तेही नाही. म्हटलं तर प्रत्येकाला, अगदी शेवटचा बिंदू असलेल्या मला गवसलेलंही नवं..! कारण ज्ञान स्वयंभूपणे आहेच.

ज्ञानाची जगण्यातून अभिव्यक्ती होणं हीच ज्ञान होण्याचीही अवस्था आहे. प्रत्यक्ष प्रतीती हीच ज्ञानाची, ते मिळाल्याची खरी खूण आहे.

फुलात गंध असतोच. त्याच्या आस्वादाचा क्षण तो गंध जाणवण्याचा क्षण. गंधाचा पुनर्जन्म होतो अस्वादक्षणी. तसं ज्ञान होण्याचा क्षण हा ज्ञानाचा पुनर्जन्म..!

***

1 comment: