Saturday, 9 July 2022

माझ्या डायरीतून- ६२

अद्‍भुत करार- आयुष्य रीन्यू केल्याचा

३०. ७. २०१३

माझ्यातल्या सामान्यपणाचं दर्शन मलाच घडवणारी (कदाचित दुसर्‍यांनाही) एक चुक माझ्याकडून झाली... काल धांडे लॅबमधे एक बाई चौकशीला आल्या होत्या. त्यांना शुगर टेस्ट करायची होती जेवणानंतरची आणि आल्या होत्या सकाळी. उलटसुलट काहीतरी पुन्हा पुन्हा विचारत होत्या. लॅबमधला माणूस पुन्हा पुन्हा नीट माहिती देत होता. सगळे ऐकत होते. त्यांच्या प्रश्नोत्तरात एकदा मी हसले. इतर काहीजणही हसले... नंतर वाटून गेलं मी हसायला नको होतं. त्या बाई गोंधळल्या असतील. वयामुळं काय विचारायचं कळलं नसेल.. वैतागल्या असतील. विसरत असतील... लॅबमधला माणूस न वैतागता ‘पेशंट’ला समजून घेत बोलत होता आणि मी हसले. मी बरं नाही केलं...!

....

७.८.२०१३

काल केमो संपवून घरी यायला रात्र झाली... खूप उशीर झाला पण फ्रेश वाटलं आल्यापासून. मात्र दवाखान्यात चिडचिड झाली. सलाईनच्या प्रत्येक बाटलीचा वेळ ठरल्यापेक्षा लांबत गेला.. धीर धरणं अवघड जात होतं..

पण आज सुरुवात छान झालीय. ‘लम्हा लम्हा’ अनुवाद, मेल्सना उत्तरं अशी कामं उत्साहानं करता आली... केमो-औषध आणि इंजेक्शन इ. आपला प्रभाव दाखवायला लागलेत... केमोचा परिणाम म्हणून सगळी नखं काळी पडलीत. पण त्याची शेड एकसारखी आहे. नेलपेंट लावल्यासारखी. डॉ. रानडे म्हणाले हे रेअर आहे. फोटो काढून ठेवा... डॉ. रुचा यांनी फोटो काढून घेतलाय.

.....

१४.८.२०१३

प्रतिभा (माझी बहीण) म्हणाली, आपण भोवतीच्या प्राणवायूमधून थोडा आपल्यासाठी शोषून घेत असतो.... आपली प्रत्येक पेशी श्वास घेत असते.... हा विचार मनात घोळत राहिला.... `ईशावास्य' मधला सतरावा मंत्र आठवला. ‘वायुरनिलममृतमथेदं...’ (वायुः अनिलम् अमृतम् अथ इदम्...) ‘भोवतालचा प्राणवायू अमृतम् असतो. म्हणजे अ-मृत... न मेलेला.. सतत जिवंत असलेला...’ असा याचा अर्थ आत्ता एकदम जाणवला... आपण आत घेतला की तो आपला होतो, वापरला जातो.

वैश्विक प्राण आपल्या आतल्या अस्थिर प्राणाला असंख्य मितींमधून लगडलेला असतो. शब्द, स्पर्श, रस, रूप गंधामधून अव्याहत होणारी त्याची आवक-जावक... देवाण-घेवाण उत्कटतेनं अनुभवणं म्हणजे आत्ता.. या क्षणात जिवंत असणं..! आपल्या असण्याचा अनुभव घेणं. अशा प्रत्येक क्षणी आयुष्य रीन्यू केल्याच्या करारावर सही होत असते... काल या आशयाची कविता लिहिली आणि एकदम खूप छान वाटलं... ही कविता लिहिताना सुचण्याचा आवेग थ्रीलिंग होता.. लिहून झाल्यावर लिहिता येण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.

शारीरिक आजार इतक्या खोलवर नेऊन असं काही घडवत असेल तर त्याला सलाम... डॉक्टर्स आजारावरील उपचारांचे साइड इफेक्ट्स सांगतात.. मला त्यांना असे काही पॉझिटीव्ह साइड इफेक्ट्स सांगता येतील...

***

आसावरी काकडे

Friday, 8 July 2022

माझ्या डायरीतून- ६१

मला विचारांनी आधार दिला...

८.७.२०१३

परवा पेटकर आजींनी मुलाबरोबर फुलं पाठवली होती देवाला वाहण्यासाठी. त्यांच्या भावना समजून घेताना गहिवरून आलं. कोण कोण कशा कशा तर्‍हेनं आपल्यासाठी शुभचिंतन करत असतं ना? किती असंख्य प्रभाव एकाच वेळी कार्यरत असतात. सगळ्या घडामोडी घडत असताना अशा प्रभावांनी थरथरत असतील.... एखादी घटना घडली.. पूर्ण झाली असं कुठं होतं? ती सतत घडतच असते. घडण्याच्या प्रक्रियेतच असते... दिवस उलटला की वाटतं त्या दिवसाच्या घटनांना पूर्णविराम मिळाला.. पण खरंतर त्या मागील पानावरून पुढे चालूच राहतात....

......

१२.७.२०१३

काल ललिता ताम्हणेशी ‘लम्हा लम्हा’ बद्दल सविस्तर बोलणं झालं. वीस वर्षांपूर्वी करून ठेवलेलं, पडून राहिलेलं अनुवादाचं काम अचानक समोर आलं. ‘लम्हा लम्हा’च्या नवीन आवृत्तीनुसार पूर्वीचा अनुवाद आताच्या जाणकार नजरेतून तपासायचाय.... ही पूर्ण प्रक्रिया घरबसल्या होण्यासारखी आहे. दीप्ती नवल, ललिता ताम्हणे, डिंपल पब्लिकेशन सर्व यात सक्रिय आहेत. मी फक्त अनुवाद पूर्ण करून द्यायचा आहे... एखाद्या गोष्टीचा जबरदस्त योग जुळून येतो म्हणजे काय त्याचं हे उदाहरणच झालं...

आकाशवाणीसाठी एका नाटकाचा अनुवाद करून द्यायचा आहे... ‘तरीही काही बाकी राहील’ या अनुवादित कवितासंग्रहाची प्रुफं तपासून नुकतीच पद्मगंधाकडे दिली.

.....

१७, २३.७.२०१३

अशा कामात गुंतल्यामुळे काल सहावी केमो बर्‍यापैकी हसत-खेळत पार पडली...

काल एका मैत्रिणीशी फोनवर बोलत होते. ती सध्या अडचणींना तोंड देते आहे. काय काय सांगत होती. तिची देवावर खूप श्रद्धा आहे. तिला त्याचा आधार वाटतो.... बोलताना मी म्हणून गेले की या काळात मला विचारांनी आधार दिला... खरंच आहे हे..!

.....

२७.७.२०१३

माईकडून भीमरूपी स्तोत्र लिहून घेतलंय. रोज मोठ्यानं म्हणायचं ठरवलंय. भय्यामामानी सांगितलं की हे म्हणत जा. श्रद्धेनं म्हटल्यावर कुणाला कसा फायदा झाला हे पण सांगितलं.... हे पटून किंवा त्यावर भुलून ते करावं असं वाटलं नाही. पण त्याच्या भावनांचा मान करावा असं वाटलं. पण प्रत्यक्ष म्हटलं जाईना. माई आली होती राहायला. अंघोळ झाल्यावर ती पठणात शिकलेली बरीच स्तोत्रं म्हणत होती. ते ऐकल्यावर वाटलं, आपणही ‘ईशावास्य’ मनात म्हणतो ते मोठ्यानं म्हणावं. प्रतिभा पण म्हणाली होती, जे काही वाचशील ते मोठ्यानं वाच. पुस्तक असो, स्तोत्र असो.. त्यामुळे श्वासाचा व्यायाम होतो. ते पटलं. तसं करावसं वाटलं... आता असं ठरलंय, ईशावास्य आणि भीमरूपी रोज मोठ्यानं म्हणायचं....

विवेकाची कास धरणार्‍या माझा हा पराभव आहे काय? पूर्वी मला हा पराभव वाटला असता... नाईलाजानं, रोजचं एक काम म्हणून पूजा करताना चुकतंय असं वाटून रडूच आलं होतं. आता हे म्हणताना माझी भूमिका मला माहिती आहे. मी हे मोठ्यानं का म्हणणार आहे आणि त्यामुळं काय होऊ शकतं... हे मला स्पष्ट झालेलं आहे. आणि विवेकाच्या गटातून काही वेळ श्रद्धेच्या गटात गेलं तर परतीचा रस्ता राहात नाही असं काही नाही. इकडून-तिकडे करण्याचा खुलेपणा आपण आपल्याला देण्यात सवडीशास्त्र आहे असं मला वाटत नाहीए...

***

आसावरी काकडे

Thursday, 7 July 2022

माझ्या डायरीतून- ६०

आजाराचं असंही ‘पुनर्वाचन’..!

१२, १३, २१.६.२०१३

डॉ. कसबेकरांना फोन केला होता हात काखेत ओढल्यासारखा दुखतोय म्हणून.. तर ते म्हणाले की ते हीलींगमुळे होतंय... तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून सगळं केलंय. तुम्ही फक्त काळजी करू नका. ते माझ्या हातात नाही....

....

पाठ, मान, खांदा, पोर्टची जागा सगळं दुखतंय. रोज. सहन होईना झालं की पेन कीलर घेतेय. रडू येतंय मधून मधून.. बधीर संवेदना जागी होतेय.. अजून काही दिवस वेदनांची बदलती रूपं अनुभवायची आहेत या आजाराच्या नावाची. डॉ.च्या मते हे सगळं किरकोळ, अटळ आणि न्यूनतम आहे. त्याचा मी बाऊ करू नये...

.....

गेले काही दिवस मान-पाठ... दुखत होती. काल पेट स्कॅनसाठी सकाळी ११-११.३० पासून तीन वाजेपर्यंत वेगवेगळ्या अवस्थांमधे बसावं लागलं. स्कॅन टेस्टसाठी अरुंद पट्टीवर अर्धा तास ए. सी. मधे गच्च पडून राहावं लागलं.... तरी मान-पाठ जराही दुखली नाही. घरी आल्यावरही नाही. उलट फ्रेश वाटत होतं... आश्चर्यच आहे ना? म्हणजे दुखणं सतत लक्ष जाण्यामुळे वाढतं? कळत? निर्माण होतं? दुसरं व्यवधान आल्यामुळे दुखण्याकडं लक्ष गेलं नाही म्हणून दुखलं नाही? ... विचार करण्यासारखी गोष्ट आहे...!

..... 

२२.६, १.७, ४.७.२०१३

काल मनीषा आणि तिचे मिस्टर आले होते. त्यांनी NLP तंत्राविषयी सांगून त्याचे दोन प्रकार करून घेतले... ही सर्व तंत्र म्हणजे इच्छाशक्ती वाढवण्याची आणि विचलित होण्यापासून दूर नेणारी आहेत... त्याचा उपयोग करून घ्यायला हरकत नाही.

नंतर बर्‍याच गप्पा झाल्या... त्यांना म्हटलं की आजार आपल्याला माहीत नसलेलं काहीतरी बरं करण्यासाठी असतो / आहे असं वाटतं आहे... ‘फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे...’ ही ओळ या संदर्भात आठवतेय. निद्रिस्त ‘स्व’ला जाग आणण्यासाठी आलेलं हे वादळ आहे. पण ते ‘ज्योती’चं कवच बनून आलंय...! आजाराचं असंही ‘पुनर्वाचन’..!  

....

पाचव्या केमोत दिलेल्या स्ट्राँग औषधांचे परिणाम हळूहळू रंग दाखवायला लागलेत. काल.. परवा डाऊन व्हायला झालं. अंग दुखणं, तोंड येणं, कॉन्स्टिपेशन.... चालू आहे... या निमित्तानं ६३ वर्षे आत शरीरात.. मनात कुठे कुठे काय काय साचलं असेल त्याचा निचरा होतोय... नव्याला जागा तयार होतेय.. असा अंतर्बाह्य निचरा होताना थोडी उलथापालथ होणारच ना... या साफसफाईची ‘दमणूक’ एवढी किंमत जास्त नाही...

केमोमुळे केस जायला लागले तेव्हा रडू यायला लागलं होतं खूप. अपेक्षित होतं तरी. आता भुवया, पापण्यांचे... पूर्ण शरीरावरचे केस गेलेत. या घटनेकडेही आता मी ‘स्वच्छता’ म्ह्णून पाहतेय. केसांची अशी समूळ सफाई एरव्ही कधीच शक्य नव्हती... साइड इफेक्ट्स असेही असतात..!

......

५, ६.७.२०१३

दिलीप चित्रे यांची ‘मी’ नावाची एक कविता ‘प्रिय रसिक’च्या मुखपृष्ठावर आलीय. त्यात एक ओळ आहे, ‘... हे मी स्वतः अनुभवलं तरी अनुभव म्हणजे खरं शहाणपण नव्हे.’ या ओळीनं भानावर आणलं. सध्या मी प्रत्यक्ष अनुभवण्याला अधिक मह्त्त्व द्यायला लागलेय... आपण अनुभवाकडे कसं बघतो त्याला महत्त्व आहे. म्हणजे आपला दृष्टिकोन महत्त्वाचा. त्या संदर्भातला विचार, जाणीव महत्त्वाची.

तरी ज्याचा विचार करायचा तिथे ठोस अनुभव हवा ना... पोकळीत, तर्कानं विचार नाही करता येणार. तसंच अनुभवही सजगपणे अनुभवता यायला हवा... तो नुसता शरीर-मनावरून ओघळून चालणार नाही.

अशा संदर्भात संकल्पनात्मक विचार-व्युहाबद्दल काय म्हणता येईल? म्हणजे गणित, विज्ञानातले हायपॉथिसिस इत्यादी... हा खूप वेगळा मुद्दा होऊ शकेल.

......

स्वतःची हार्दिक सेवा चालू आहे.... विचारांना नवे नवे आयाम कळतायत. वैचारिक बधीरतेला तडा जाणं हा सध्याचा सगळ्यात मोठा उपचार म्हणता येईल...

***

आसावरी काकडे

Wednesday, 6 July 2022

माझ्या डायरीतून- ५९

नुसतं असण्याचा आनंद...

१५.५.२०१३

एवढा सगळा विचार केला... त्याचा परिणाम म्हणून ठरल्याप्रमाणे १३ तारखेला केमोपोर्ट बसवण्याचं छोटं ऑपरेशन झाल्यावर शुद्ध आली तेव्हा काही क्षण मनात ‘लोका समस्ता सुखिनो भवन्तु...’ असं म्हणता आलं. पण नंतर दुखायला लागल्यावर कुरकुर सुरू झाली... आणि एकदा तिला वाट मिळाल्यावर तिनं चांगलेच हात-पाय पसरले. दोन दिवस सलाईन लावून ठेवलं होतं. सहनशक्तीची कसोटी होती. पण अखेर संपले ते दोन दिवस.... डॉ. कसबेकर शुभेच्छा द्यायला आले होते. बरं वाटलं...

In a state of mere being lies the ectasy of living..’ हे दादाजींचं वाक्य समोर आहे. अर्थ कळतोय. पण तसा आनंद घेता येत नाहीए. ‘मी आहे’ याचा अनुभव वेदनेला चिकटून येतो. तेव्हा वेदनाच लक्ष वेधून घेते. तिच्या तावडीतून सुटून ‘केवल असणं’ अनुभवता येत नाही...

......

२७, ३०, ३१. ५. २०१३

‘पोर्ट’ प्रकरण किरकोळ असेल असं वाटलं होतं. त्या मानानं ते बरंच दमवतंय. इतका त्रास होईल असं आधी कळलं असतं तर त्यामानानं काही नाही त्रास असं वाटलं असतं... त्रास वाटणं किती सापेक्ष असतं..! जे होतंय ते त्याच्या ‘in itself’ आकारात मी अनुभवावं...

......

शरीराचं स्वतःचं म्हणून एक व्यवस्थापन असतं. ते निकराच्या प्रयत्नानं तग धरायचा प्रयत्न करत असतं. मनानं त्याच्या व्यवस्थापनात लुडबुड करू नये.... हरप्रकारे लुडबुडीपासून मनाला परावृत्त करणं चालू आहे.... लुडबुडणारं तेच आणि परावृत्त करणारंही तेच..! मजा आहे सगळी...

.....

आता एकदम रिकामपण जाणवलं. एखादं काम संपल्यावर येतं तसं.... ‘दुखण्या’ला त्याच्या जागी ठेवून दिलं आणि त्याच्या कुरकुरीकडे दुर्लक्ष करायचं ठरवून टाकलं. त्याला प्रतिसाद म्हणून कुथणं बंद केलं. काळजीची घडी करून ठेवली.... तर चक्क रिकामपण यावं? ... म्हणजे ते भरण्यासाठीच मी कुथत होते की काय? कमाल आहे..!!

Mere Being’ मधला आनंद का अनुभवता येत नाहीए? काही तरी काम करत राहून नाहीतर दुखण्याचं कौतुक करतच ‘असणं’ साजरं करता येतं का?

.....

१, ३, ४, ५. ६.२०१३

जाणीव लखलखित जागी आहे तोपर्यंत तिच्या विस्ताराचे मार्ग क्षणिक कुरकुरीनं रोखून ठेवू नयेत... भोवर्‍यासारखी जागीच गरगरत भोवळ आणण्यापेक्षा दूर इकडे तिकडे बघावं.. ऐकावं.. स्पर्शावं.. हुंगावं.. चाखावं... सगळं ‘असणं’

पण...Spirit is powerful but flesh is weak..’ याचा ठायी ठायी प्रत्यय येतो आहे.

.....

खरंतर आपल्या कितीतरी गोष्टी परस्वाधीन असतात. तरी बर्‍या-वाईटाला आपण स्वतःला जबाबदार धरतो... आपल्या हातात करण्यासारखं जे काही आहे ते करून मग पूर्णपणानं जे वाट्याला येईल ते ‘प्रसाद’ (हा शब्द कसा काय सुचला मधेच?) म्हणून स्वीकारावं.... नुसत्या विवेकानं स्वीकारण्यापेक्षा त्याला प्रसाद ग्रहण करण्याची भावना जोडण्यानं काय होईल? ती भावना आतून सहज यायला हवी.. नाहीतर ते स्वतःला फसवणंच होईल बहुधा... की सवयीनं हार्दिकता येईल त्यात?

नुसतं असणं ‘Mere Being’ कसं अनुभवता येईल? त्याचा आनंद का, कसा वाटायला हवा?

.....

नुसतं असणं अनुभवणं म्हणजे त्याची जाणीव करून देणार्‍या वेदनांमधून मुक्त होणं. त्या फक्त ‘मी आहे’ हे लक्षात आणून देण्यापुरत्या असतात...  आनंद... सुख किंवा दुःख... वेदना यांच्या आवरणांच्या आतलं केवळ असणं जाणवणं, अस्तित्वभानात सजग असणं ‘आनंद’दायी असणारच ना..!

.....

आनंद / दुःख वेदनाविरहित केवल / नुसतं असणं असं काही आहे का? की ती केवळ कल्पना आहे? की ‘केवळ असण्या’चा वेध म्हणजे एकेका आवरणाचे ओझे ओझे कमी करत जायचे...?

***

आसावरी काकडे

Monday, 4 July 2022

माझ्या डायरीतून- ५८

२.५.२०१३

काल सकाळी सुमन, आक्का, भाउजी भेटायला आले होते. नंतर मामा, मामी, गीता.. आले. थोडी दगदग झाली. पण दमायला झालं नाही. त्रासही नाही वाटला. मामा जताना म्हणाले, ‘मांडुक्य उपनिषद’ वाच...’ लगेच काढून वाचायला घेतलंय... बघू मन रमतं का ते. वैश्विक विचार.. एकत्व वगैरे सुंदर उद्‍धृताप्रमाणे तिरस्कारणीय वाटू शकते... या इथल्या वास्तवात ऑपरेशनमुळे पडलेला ‘खड्डा’ एकसारखा ठसठसत असताना मी ‘त्या’ वश्विक वास्तवाचे गोडवे कसे गाऊ शकणार? एकेक पान गळावया..ची आठवण गळणारे केस देत राहिलेत...

.....

७.५.२०१३

‘अमित आनंदाचे विश्व’ (लेखक- डॉ. मो. रा गुण्ये) मधील मांडुक्य उपनिषद वाचायला घेतलंय. मन रमतंय त्यात. एकूण अस्तित्वाचे ब्रह्म... हिरण्यगर्भ... वगैरे चार स्तर असतात तसे आपल्या अस्तित्वाचेही चार स्तर आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया... उपनिषदात याला चतुष्पाद म्हटलं आहे.

जागृतीत सर्वत्र व्दैत आणि व्दंव्द असतं... स्वप्नात दृश्य, द्रष्टा सर्व आपणच असतो. जागृतीत जाणीव स्थूल असते. स्वप्नात सूक्ष्म होते.....

ब्लॉग लिहायला सुरुवात केलीय. प्रतिसाद छान आहे. नवं काही तरी सुचायला हवं.... एकूण ‘कोशा’तून बाहेर पडतेय... ये तो होना ही था..!

.....

९.५.२०१३

‘सुषुप्ती’मधे मन सुद्धा निद्राधीन होतं. जागृती-स्वप्न या दोन अवस्थांमधे मन जागं असतं. ‘सुषुप्ती’मधे सर्व व्दैताच्या पार एकाकार अवस्थेत जीव पोचतो. पण तेव्हा मनासह सर्व निद्राधीन असल्यामुळे त्या एकत्वाची जाणीव होत नाही. सुषुप्तीतून स्वप्नात, स्वप्नातून जागृतीत आल्यावर मन, इंद्रियं जागी होतात. पण त्यांना ‘सुषुप्ती’मधला अनुभव आठवत नाही....

तेरा तारखेला ‘केमो-पोर्ट’ बसवायचा आहे. एक छोटं ऑपरेशन. त्यापूर्वी पुन्हा टेस्ट्स... शरीर पुन्हा पुन्हा फिटनेसच्या कसोटीला उतरतंय.... मोठ्या ऑपरेशनच्या ‘डॉक्टरेट’नंतर आता त्याला पुन्हा एम ए चा एक पेपर द्यायचाय.

‘ड्रेन’ एपिसोड झाल्यावर तिथल्या तिथं गुरफटलेल्या मनाला बाहेर पडण्याचा इशारा दिलाय. तरी मधून मधून ते मागे वळून बघतंय....

मधे एक दिवस मन छान बाहेर पडलं. इतकं की मागं वळून पाहिल्यावर ‘ऑपरेशन’ एपिसोड अख्खाच त्याला स्वप्नासारखा वाटला... हे खरंच घडलंय? असं वाटून गेलं...

.....

१२.५.२०१३

‘अमित आनंदाचे विश्व’ मधील मांडुक्य उपनिषदावरील भाष्य वाचून झालं... माणूस म्हणून आपल्या अस्तित्वाची एकमेव खूण म्हणजे विचार करता येणं. ‘I think, therefore I am’ हे देकार्त यांचे विधान या दृष्टीनं अर्थपूर्ण आहे. या संदर्भातील डॉ गुण्ये यांचं विवेचन वाचताना मनात एक कल्पना चमकून गेली... म्हणजे ‘निरोप’ घेण्याची ऐच्छिक अवस्था कोणती? उपाय थांबवण्याची रेष कुठे आखायची? या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं झालं...

वाटलं, मी विचार करू शकते, सर्वांचं हीत चिंतू शकते तोपर्यंत मी जगायला हरकत नाही. विचार ही पण एक कृती असते. किमान या स्तरावर कृतीशील राहाता यायला हवं. तोपर्यंत आपल्या प्रयत्नांच्या मर्यादेत जगण्यासाठीचे सर्व प्रयत्न, उपाय करायला हरकत नाही..!

प्रत्येक केस म्हणजे डॉक्टरांसाठी एक प्रॅक्टिकलचा पेपर असतो. मृत्यूनंतर अभ्यासासाठी देहदान करतात.... आपला आजार, आपली केस ही डॉक्टरांसाठी लहान-मोठी आव्हानं असतात. असा विचार केला तर आपल्या दुखण्याकडे जिवंतपणीच ‘देहदाना’चं ‘पुण्य मिळवण्याची संधी असं पाहता येईल. All that matters is attitude... घटनांचे अर्थ लावण्यावर त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो... (चाळीस वर्षांपूर्वीच्या माझ्या ब्रेनच्या ऑपरेशनचे सर्व पेपर्स कमांड हॉस्पिटलमधे ‘To be preserved’ असा रिमार्क मारून ठेवले होते... ते आठवलं..!)

असा विचार केल्यामुळे वेदना कमी झाल्या असं नाही पण चिडचिड... त्रासणं कमी झालं. सलाइनसाठी सुई लावताना शीर सापडेपर्यंत इथे-तिथे टोचून बघणार्‍या नर्सचा राग येईनासा झाला... 

***

आसावरी काकडे


Sunday, 3 July 2022

माझ्या डायरीतून- ५७

११.४.२०१३

आज पाडवा. नव्या वर्षाची सुरुवात. मनातला संकल्प इथं नोंदवण्याचा दिवस..! वेळोवेळी पडणार्‍या प्रश्नांच्या निमित्तानं अभ्यास, विचार केला. त्यातून उमगलेलं वेगवेगळ्या तर्‍हेनं शब्दबद्ध झालंय... ते शहाणपण, ‘ज्ञान’ आत्मसात करणं म्हणजे ‘भक्ती’ असं समजून घेत असा ‘भक्तीमार्ग’ स्वीकारायचा संकल्प आज करते आहे...

डॉक्टरी उपचारांच्या चक्रात सापडले आहे. माझ्या बरोबर सगळी आहेत. ‘जत्रे’तल्या भव्य चक्रात बसण्याचं तिकीट काढून आत पाय ठेवलाय.... भीती ओलांडून हसत खेळत मजेत चक्र वर गेलंय.... आता त्याच उमेदीनं पुढचा प्रवास पार पाडण्याचाही एक संकल्प... कोणताही विकल्प मनात न आणता, हात-पाय न गाळता, न घाबरता, स्वतःला.. डॉक्टरांना, उपचारांना, भोवतीच्या सर्व सुहृदांना पूर्ण सहकार्य देत... डॉ.नी आखलेला ‘आठ केमो, २९ रेडीएशन, नंतर औषधं..’ हा कोर्स पूर्ण करायचा.. बिनबोभाट..!

......

२७.४.२०१३

ऑपरेशन नंतर ड्रेन होत राहणारा स्त्राव (fluid) ड्रेन ट्यूब बसवून काढला जात होता. ती ट्यूब काढल्यावर तो आतच जमायला लागला. दोनदा सिरींजनं काढून टाकला होता. आता पुन्हा जमलाय.. डॉ. कसबेकरांना कळवलं. ते म्हणाले सोमवारी या. सारखं सारखं सुई लावणं योग्य नाही. काही दुखत नाहीए. पण भीतीनं अस्वस्थ केलंय. सोमवारपर्यंत धीर धरवत नाहीए. सारखं तिकडे लक्ष वेधतंय. ‘होण्यावर’ सोपवण्याच्या प्रक्रियेत मी अज्ञ लुडबुड करू नये असं स्वतःला समजावतेय. पण जमत नाहीए... डॉ.नी सांगितलंय त्या अर्थी त्यांना अंदाज असेलच ना की आठवड्याभरात किती जमू शकेल... तो आत राहिला तरी चालणार असेल.. मी त्यांचं का ऐकत नाहीए?..

ही गोष्ट इतकी त्रासण्यासारखी नाहीए खरंतर... आजारातच पाय रोऊन उभं राहायचं आणि चालता येत नाही म्हणून कुथायचं... हे बरं नाही. तिकडे दुर्लक्ष करून या आजारानंतर अंतर्बाह्य बदललेलं माझं नवं रूप पाहायची उत्सुकता मी ठेवायला हवी.... खरंच कशी दिसेन मी नव्या उगवलेल्या केसांमधे? कसे असतील ते? काळे? कुरळे? पिकलेले तरी सुंदर.. रेशमी? आतून किती बदललेली असेन मी?

पूर्ण निष्पर्ण झालेलं झाड पुन्हा नखशिखांत बहरतं तेव्हा फक्त पानंच नवी उगवलेली असतात की आतही होते पुनर्मांडणी?

.......

२९.४.२०१३

स्वतःला इतकं समजावूनही काल नाराज होण्यात, काळजी करण्यात, रडण्यात.. दिवस घालवला.... पूर्ण निष्पर्ण होऊन पुन्हा उगवताना आत पुनर्मांडणी होते का या प्रश्नाचं उत्तरच मिळालं जणू... काही करा आंतरिक परिवर्तन होणं मुष्कीलच दिसतंय...!

रडू रडू झालेल्या मनाला दीर्घ वाटावी अशी वाट पाहिल्यानंतर तो सोमवार आला. डॉ. कसबेकरांकडे संध्याकाळी जायचं होतं ‘भरलेला स्त्राव’ काढून घेण्यासाठी. त्यांना तसा sms केला तर त्यांचा फोन आला की आताच या देशमुख हॉस्पिटलमधे म्हणजे तुम्हाला संध्याकाळपर्यंत वाट पाहायला नको... फोन आल्यावर हुश्श झालं. काही आवरलेलं नव्हतं. तरी येते म्हणून सांगितलं. आर्ध्या तासात आवरून गेलो. डॉ.नी लगेच आत या म्हटलं. गेले. तपासलं. म्हणाले फ्लुइड जमलेलंच नाहीय..!!

अरे.. असं कसं.. आश्चर्य वाटलं. विश्वासच बसेना... भानावर आल्यावर स्वतःच्या काळजी करत आठवडाभर सगळ्यातून लक्ष उडण्याइतकं अस्वस्थ होण्याचं हसू आलं. लाज वाटली...!

जरावेळ बसले. डॉ. देशमुख मला ओळखतात, माझ्या कविता वाचल्यायत... इत्यादी बोलणं झालं. ते आणि कसबेकर नुकतंच ऑपरेशन करून आले होते. त्यांना ‘केमोपोर्ट’बद्दल (केमोसाठी सलाइन देताना सुई सहज लावता येण्याची सुविधा..) विचारलं. त्यांनी बसवून घ्यायला सांगितलं. आजची ‘मिटिंग’ अनपेक्षित झाली. अचानक. संध्याकाळऐवजी सकाळीच. मी काळजीच्या / त्रासण्याच्या ‘शिखरा’वर असताना डॉ.चा फोन आल्यावर भावूक व्हायला झालं. आपल्या मनातलं डॉ.ना कळलं वगैरे वाटलं...

आठवडाभर या गोष्टीचा विचार, काळजी करण्यात घालवला असं म्हटल्यावर डॉ. म्हणाले, असं करू नका. याचा तुम्हालाच त्रास होईल. यापेक्षा किती वाईट स्थिती असते एकेकांची वगैरे.. रडू येण्याबद्दल म्हटलं तर म्हणाले, तुम्हाला psychiatrist कडे जायचंय का?... नाही म्हटलं....

खरंच मी काय वेडेपणा चालवलाय... हातात काही काम नाही म्हणून अतिरिक्त लक्ष जातंय स्वतःकडे आणि आणखी खोलात बुडायला होतंय. मला बाहेर यायला पाहिजे यातून लवकरात लवकर...

(या अनुभवानं मला मनाच्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं...! नसलेल्या गोष्टीच्या कल्पनेनं ते इतका त्रास करून घेऊ शकतं...!!)

***

आसावरी काकडे

Friday, 1 July 2022

माझ्या डायरीतून- ५६

३.४.२०१३

थर्ड डिग्री थर्ड स्टेज कॅन्सर होता असं रिपोर्टमधे आलं. मग पुन्हा त्या बायप्सी सॅम्पलची टेस्ट आणि माझी पेट स्कॅन अशा टेस्ट झाल्या. पेट स्कॅनची भीती आणि करावं लागतंय याचा त्रास, दुःख, चिडचिड... सगळे टप्पे पार करत, प्रत्येक उपचारापूर्वीच्या टेस्टस देत पहिली केमो पार पडली. तरी कॅन्सर शब्द लिहवत नाहीए. भीतीनं नाही, तसं नसेलच या विश्वासाचा असर अजून असेल म्हणून...

केमोचा त्रास असह्य असा काही झाला नाही. फक्त उजवा हात सलाइनला अडकल्यामुळे जेवण भरवून घ्यावं लागलं. सारखं पाणी आणि सलाईनमुळे झोपल्याजागी ‘पॉट’ घ्यावं लागलं. तोंडाची चव पार म्हणजे पार गेली... आतून कसलं तरी कोटिंग केल्यासारखं वाटत होतं. मळमळ.. गरगर होत होती. सगळ्यांची मदत घ्यावी लागत होती. २-३ दिवस एका बाजूला ड्रेन ट्यूब आणि दुसर्‍या बाजूला सलाईनमधून केमो ड्रग्ज चालू अशा अवस्थेत बेडवर उताणं पडून राहावं लागलं.... आणि हसरा चेहरा ठेवत काही त्रास नाही असं म्हणावं लागलं.

यातली प्रत्येक गोष्ट म्हटलं तर आकांत करावा अशी, असं सोसण्यापेक्षा आता ‘बास’ म्हणावं अशी... म्हटलं तर स्वाभाविक.. स्वीकारलं तर कुठे काय असं म्हणावं अशी....

सात तारखेपासून कुणाकुणाची हार्दिक सोबत आहे. ‘संकट’ सगळ्यांनी मिळून झेललंय. भोवतीच्या त्या ‘सगळ्या’त मी सामिल व्हायचा प्रयत्न करतेय. देह संकटाचा वाहक आहे. अनेकांबरोबर मी पण त्याच्यासोबत आहे... सगळ्यांनी मिळून त्याच्यावरचं ओझं उतरवायचं आहे. वेदनेत विसावा, कुरुपतेत सौंदर्य भरायचंय.. त्याचं त्रेसष्ठ वर्षांचं ऋण मला फेडायचंय.... किती बरं की ते करायाला इतक्या जणांची हार्दिक मदत मिळतेय....

‘होण्या’कडे, त्याला कसलंही नाव न देता, उपाधी न लावता मी तटस्थपणे पहावं... तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते पाहावे..! खरंतर या शहाणपणाला पर्याय नाहीच आहे. पण ते मिळवण्याच्या आणि आचरण्याच्या संधीचा लाभ घेता यायला हवा....

बुद्धी आहे तर अशा युक्त्या सुचतात रोज सकाळी. पण शहाणपणाचा झेंडा फडकत नाही सतत... दिवसाबरोबर उतरत राहतो खाली आणि रात्री ‘सगळ्यां’मधे सामिल झालेली मी देहात कोसळते तेव्हा बेंबीच्या देठापासून निघालेला हुंदका माघारी परतवणं फार जड जातं...

‘फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे / वो शम्मा क्या बुझे जिसको रोशन खुदा करे..! ... ‘संकट’च जर ज्योत सांभाळणारा आडोसा झालं तर ज्योत कशी विझेल? (संकटाकडे ‘आडोसा’ म्हणून पाहण्याच्या या कल्पनेनं तेव्हा मला बराच दिलासा दिला होता.)

.......

मिलिंद बोकील यांची ‘गवत्या’ ही कादंबरी वाचायला घेतली होती. ती वाचून झाली. एका पट्टीवर तंबोरा लावून ठेवावा तसं ४१० पानी एकसुरी वर्णन आहे... एका गावाचं, त्यातल्या विविधरंगी माणसांचं, मनाचं आणि मधून मधून समजत गेलेल्या तत्त्वज्ञानाचं.... कुठलाच ‘मुद्दा’ नवा वाटला नाही. शैलीही साधीच. ‘नुसतं असणं’.. अनुभवणं, त्यासाठी डोंगरावर गुहेत.. एकटं बसणं, गुरुजींचं शिकवणं.. हे यातलं महत्त्वाचं वर्णन तसं प्रभावी, नवं वाटलं नाही. त्यानं भारावून जाऊन अमेरिकेत एखादी संस्था काढण्याच्या प्रक्रियेत त्याला निमंत्रण मिळणं हे काहीच्या काहीच वाटतं..!

......

४.४.२०१३

काल कसबेकर डॉक्टरनी भेटायल बोलावलं होतं. गेलो... डॉ.नी तपासलं आणि काही कळायच्या आत टाके आणि ड्रेन ट्यूब सुद्धा काढली. इतकं अनपेक्षित झालं हे की हुश्श फील यायला वेळ लागला. जरा वेळ बसते म्हटलं. मग डॉ.शी गप्पा झाल्या. त्यांना ‘ईशावास्यम्‍...’ पुस्तक दिलं होतं. अप्रतिम लिहिलंय असं म्हणाले. मग स्वतःच्या अध्यात्मिक असण्याविषयी सांगितलं.... स्वतःच्या इनकम मधलं अर्धं ते भटक्या कुत्र्यांवर खर्च करतात. स्वतः साधं राहतात... पेशंटला आधीपासून टाके, ट्यूब काढणार असल्याचं सांगत नाहीत कारण पेशंट आधीपासूनच कल्पना करत राहतो.... इ. खरंच आहे.. ट्यूब कशी काढणार याची तर मी कल्पनाच करू शकत नव्हते.. ती कधी काढली कळलंही नाही. फारच थोडं दुखलं त्या मानानं.. आता हुश्श वाटतं आहे..

....

१०.४.२०१३

हुश्श वाटणं जुनं झालं... मग केसांची मुळं दुखणं सुरू झालं. केसांचा स्पर्श निर्जीव वाटायला लागला. कपडे काढताना केसांना लागणारा धक्काही दुखायला लागला. सोबत भीती की कपड्यांबरोबर केसही निघून येतील की काय... केसांचं दुखणं आणि गळणं अपेक्षित होतं तरी रडू यायला लागलं. राहून राहून पुन्हा पुन्हा वाईट वाटत राहिलं... अशा वाईट वाटण्याचं आश्चर्यही... कारण चाळीस वर्षांपूर्वी (ब्रेनच्या ऑपरेशनसाठी..) वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी दाट, काळीभोर, लांबसडक वेणी कापून टाकून गोटा केला होता एका दमात... ते मी किती सहज स्वीकारलं... रुमाल बांधून फिरताना कसलीही फिकीर वाटली नाही... नोकरीत असूनही..! आणि आता वयाच्या ६४ व्या वर्षी केस गळण्याचं दुःख..? वाईट दिसण्याची भीती? कमाल आहे..! असो.. पण आता स्वीकाराची तयारी झाली. गळणार्‍या केसांसाठी एक पिशवी केलीय आणि केस दुखू नयेत कपडे काढताना म्हणून रुमाल बांधण्याचा उपाय शोधलाय...! दाताच्या वर हिरडीला गालाच्या सापटीत फोड आलाय. त्यानंही रडवलं केसांबरोबर... त्यासाठी औषध लिहून दिलंय डॉक्टरानी.

काहीही होऊदे ‘उपाय’ सज्ज असतात सेवेसाठी. उपायांचा अपाय व्हायला लागला तर त्यावर नवा उपाय असतोच..!

काल केंद्रीय हिंदी निदेशालयाचं पत्र आलं. अहिंदी भाषी लेखकांच्या हिंदी साहित्यासाठी असलेल्या एक लाख रूपयांच्या पुरस्कारासाठी ‘इसीलिए शायद’ या हिंदी कवितासंग्रहाची निवड झाली म्हणून. पत्र पाहून खूप आनंद झाला... हे पत्र यायच्या नुकतंच आधी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या ‘गोविलकर’ पुरस्कारासाठी ‘ईशावास्यम्‍...’ची निवड झाल्याचं समजलं..! आनंद फेसबुकवर शेअर केला... अनेकांनी अभिनंदन केलं. छान वाटलं...

त्रास.. दुःख.. वेदना.. याची दुसरी बाजू..!

***

आसावरी काकडे